मुंबई – राज्यातील दुष्काळाची भीषणता पाहता दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे 48 तासात निराकरण करा, असे स्पष्ट आदेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करून दुष्काळावर मात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव युपीएस मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, यांच्यासह जवळपास 500 जण सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यासाठी 8879734045 हा व्हॉट्स ऍप क्रमांक जाहीर केला.
टॅंकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पीक विमा यासारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात. त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत असे सांगून फडणवीस म्हणाले, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार या सर्व प्रशासकीय यंत्रणेने संवादात तसेच व्हॉट्स ऍप क्रमांकावर नोंदवल्या जाणाऱ्या बाबींची नोंद घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा, असे निर्देश दिले.