पिंपरी – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पाच हजार 156 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
करोना या साथीच्या आजाराचे रुग्ण मिळू लागल्याने सामुहिक संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने 21 मार्चपासून टाळेबंदी जाहीर केली. दुकाने बंद करण्याबाबत पोलिसांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले. मात्र त्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरूच ठेवल्याने त्यांच्यावर प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून भा.द. वि. कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात सुरवात केली. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात सरकारने संचारबंदीचेही आदेश दिले. तर 25 मार्चपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.
संचारबंदीच्या काळात अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर मोकाट फिरत असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर सर्व खासगी वाहने रस्त्यावर आणण्यास मनाई केली. एवढ्यावर पोलीस थांबले नाहीत तर त्यांनी सर्व पेट्रोल पंप धारकांना फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांकरिता इंधन देण्याच्या सूचना केल्या. पोलिसांनी विविध उपाययोजना करूनही अनेकजण विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरताना दिसून आले. यामुळे पोलिसांनी अशा वाहन चालकांची वाहनेही जप्त केली.
प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दुकान सुरू ठेवणे, संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणारे यांच्यावर भा. द. वि. कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गेल्या 21 मार्च ते 20 एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत पोलिसांनी पाच हजार 156 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.