श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांनी हिंसाचाराच्या मार्गाचा त्याग करत सुरक्षा दलांपुढे शरणागती पत्करली. मुख्य प्रवाहात परतलेले ते तरूण कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. भरकटलेले ते तरूण काही दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले होते. मात्र, त्यांच्या कुटूंबीयांनी आणि पोलिसांनी मन वळवल्यानंतर त्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडून दिला. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची ओळख उघड करण्यात आली नाही.
जम्मू-काश्मीरचे रहिवासी असणाऱ्या दहशतवाद्यांकडून आलेले शरणागतीचे प्रस्ताव स्वीकारण्याचे धोरण सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. चकमकीच्या वेळी शस्त्रास्त्रे खाली टाकणाऱ्या स्थानिक दहशतवाद्यांनाही शरणागती पत्करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे 2017 पासून मोठ्या संख्येने दहशतवादी शरण आले आहेत. दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडावा यासाठी सुरक्षा दले त्यांच्या कुटूंबीयांची मदत घेत आहेत.