नारायणगाव -लॉकडाऊनच्या कालावधीत नारायणगाव एसटी बस आगाराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. करोनाच्या महासंकटाने आगाराचे दोन महिन्यात सुमारे 4 ते 5 कोटीचे नुकसान झाले आहे, अशी माहीती नारायणगाव बस आगार प्रमुख शिवकन्या थोरात यांनी दिली.
नारायणगाव आगाराच्या अंतर्गत जुन्नर व आंबेगाव तालुका कार्यक्षेत्र आहे. दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्याने एसटीची चाके जाग्यावरच थांबली आहेत. त्यामुळे रोजचे सुमारे 6 ते 7 लाख उत्पन्न असणाऱ्या आगाराचे सध्या काम ठप्प झाले आहे. गेली 10 मेपासून राज्य शासनाच्या आदेशाने परराज्यातील मजुरांना मोफत रोज 10 ते 12 बस अशा 80 बसेसच्या माध्यमातून मध्यप्रदेश, झारखंड, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आदी राज्याच्या सीमेवर सोडण्यात येत आहे.
या बसेस (दि.17) पर्यंत सोडण्यात येणार आहे. त्यापुढे शासनाच्या आदेशाने निर्णय घेऊन बससेवा सुरु ठेवण्यात येईल. एप्रिल व मे हे दोन महिने एसटीसाठी जादा उत्पन्न मिळणारे महिने असतात. एप्रिलमध्ये शालेय सुट्टया सुरू होतात. त्यामुळे गावी व शहरात जाणाऱ्या व येणाऱ्यांची संख्या जास्त असते.
यात्रा, जत्रा असलेल्या गावासाठी फेऱ्या वाढतात. दोन महिन्यात रोज सुमारे 11 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. करोनामुळे जास्त मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. राज्यातंर्गत बस सेवा बंद आहेत. उत्पन्न बंद असल्याने महामंडळाच्या तृतीय व चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार, द्वितीय वर्गातील कर्मचाऱ्यांना 75 टक्के व प्रथम वर्गातील कर्मचारी यांना 50 टक्के पगार देण्यात आले आहे. यापुढे राज्यांतर्गत बस सेवा सुरु न झाल्यास एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.