बाजार बंद असल्याने फळे, भाजीपाला विकायचा तरी कोठे?
बारामती – जगभरात थैमान घातलेल्या करोना व्हायरसमुळे शेती उद्योगही प्रभावित होत आहे. शहरसह ग्रामीण भागातील बाजारपेठा, आठवडे बाजार बंद होत असल्याने तरकारी व फळ विक्रेत्यांनी करायचे काय? असा सवाल उपस्थित होत असून अनेकांना आपला माल फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आधी “निसर्गा’ने तर आता “करोना’मुळे आमचे जीणे कठीण झाले आहे.
खरीप हंगामातील पीक काढणीला आले असतानाच अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडचा हात हिरावला तर रब्बी हंगामात बदलत्या हवामानाचा फटका बसला त्यातूनही वाचलेले पीक तोडणीला आले असतानाच “करोना’मुळे पुन्हा मोडकळीस आला आहे. बारामती तालुक्यामधील शेतकऱ्यांकडे, पालेभाज्या, फळभाज्या आणि फळे पडून असून ही नाशवंत असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील जवळपास सर्व स्थानिक बाजारपेठा बंद पडल्या आहेत.
कोरोना संसर्ग आजार असल्याने शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरांमधील बाजारपेठा आणि आठवडी बाजारपेठा या बंद पडत असल्याने शेतकऱ्यांचा माल व्यापरी उचलत नाही तर ग्राहकही खरेदीसाठी बाहेर पडत नसल्याने शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. फळे-भाजीपाला, मटण-चिकन हे पदार्थ नाशवंत असल्याने ते अधिक काळ साठवू शकत नाहीत. त्याचा थेट परिणाम थेट शेतकऱ्यांवर होत आहे.
बहुतांवश शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात टोमॅटो, कलिंगड पीक यावे याकरिता डिसेंबर, जानेवारी महिन्यात मोठ्याप्रमाणात लागणी केल्या होत्या. या लागणीचे फळ सध्याबाजारात विक्रीसाठी आले आहेत; परंतु कोरोनामुळे 10 दिवसांपूर्वी असलेला फळ आणि भाजीपालांचा दर पूर्णपणे कोसळला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पुन्हा संकटात सापडला आहे.
पर्यायी व्यवस्था करा…
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या चुकीच्या अफवांचा मोठा शेतकऱ्यांना बसत आहे. या अफवा थांबणे गरजेचे आहेत. याबाबत योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. तर शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी फळबाग, भाजीमंडईत पर्यायी व्यवस्था व्हावी तसेच शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कवडीमोल दर…
कोरोना या संसर्गजन्य रोगांमुळे भाजीपाला, फळबाग अन्य बाजरपेठा सुन्न पडले आहेत. तसेच शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. तर सर्व मोठेमोठे कार्यक्रम जवळपास रद्द करण्यात आले आहेत.
त्यामुळे बहुतांश नागरीक काळजी म्हणून घरातून बाहेर पडण्यास अथवा प्रवास करण्यास टाळत आहेत. याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांचा फळबाग, भाजीपाला आदींवर झाला आहे. भाजीपाला व बहुतांश फळांचे दर कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पून्हा मोठ्या संकटात सापडला आहे.