अमरावती: विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतील क्वारंटाईन सेंटरची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी इंधन दरवाढीवरून राज्यसरकारवर ताशेरे ओढले. यापूर्वी सोलापुरातील पत्रकार परिषदेत इंधन दरवाढीवर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले नव्हते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कंपन्यांच्या हाती आहेत. ते सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय गेल्या काळात काँग्रेसच्या राजवटीत झाला. इंधन हे जीएसटीच्या कक्षेत नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो.
2018 साली अशीच वेळ आली होती, तेव्हा आपल्या सरकारने 5 रूपयाने दर कमी केला होता. राज्य सरकारने अर्थसंकल्पात 1 रूपये आणि आता 2 रूपये व्हॅट वाढविला. एकूण 3 रूपये राज्य सरकारने वाढविले. त्यामुळे काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधातील आंदोलन हे बेगडी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
तसेच अनलॉक 2 मध्ये गोंधळ आहे. मुख्यमंत्र्यांनी काय लॉक आणि काय अनलॉक हे स्पष्ट करावं, अस आवाहन फडणवीस यांनी केलं.
पडळकरांवर बोलताना फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं कधीच समर्थन नाही. पण राष्ट्रवादीचे नेते यावर राजकारण करत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा कुणीही त्यांना बोललं नाही”