हेळगाव – प्रतिवर्षी आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते. या काळात पेरण्या उरकल्या असल्याने पिकेही चांगली उभारी घेतात. पण, चालूवर्षी पाऊस नसल्याने यंदाही खरीप हंगाम वाया जातो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. संपूर्ण देशात करोनाचा कहर सुरू आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत.
हे संकट कमी होते तोच निसर्गानेही पाठ फिरवली आहे. सध्या करोना जोमात तर मान्सून कोमात अशी अवस्था निर्माण झाली आहे. पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गेली पाच महिने करोना महामारीला संपूर्ण देश तोंड देत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कित्येक लोक बाधित होत आहेत तर त्यांच्या संपर्कात आलेले विलगीकरणात दाखल केले जात आहेत.
दररोजच्या दिनक्रमाने शासनाबरोबरच सर्वसामान्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. करोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून मोठ्या शर्थीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. याउलट परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
अशा परिस्थितीतही बळीराजा शेतात राबत आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे हातातून गेलेले पीक यंदातरी मिळेल या आशेने बळीराजाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, निसर्गाची कृपादृष्टी यंदाही शेतकऱ्यांच्या हिताची दिसत नाही. करोनाकाळात तयार झालेला भाजीपाला, फळभाज्या शेतकऱ्याला फेकून द्याव्या लागल्या. मे महिन्यात खरीपाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्याला द्यावा लागला.
जूनच्या सुरुवातीलाच निसर्ग नावाचं वादळ आलं पेरणी करण्याइतपत पाऊस झाल्याने बळीराजाने पेरणीची कामे वेळेवर आटोपली. आता पाऊस सुरू झाल्यावर पिके जोमाने वाढतील अशी आशा त्याला होतीा. त्यानंती काही दिवस पाऊस झाला. त्याच पावसावर काही भागात पिकांनी जोम धरला आहे.
सध्यातरी पिकांची स्थिती अतिशय चांगली आहे. मात्र, आणखी पावसाची गरज आहे.
पाऊस नसल्याने पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव होत आहे. करोनासारख्या महामारीच्या काळातदेखील शेतकऱ्याने स्वतःची काळजी घेत जमिनीची मशागत करून पेरणी केली. पिकेही जोमात आली. परंतु, सध्या पाऊसच कोमात गेल्याने केवळ पावसावर अवलंबून असणारी पिके किंवा हंगाम पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी तरी निसर्गाची कृपा शेतकऱ्यावर होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आषाढ महिन्यात कधीही उष्णता जाणवत नव्हती. परंतु यावर्षी ती जाणवत आहे. या उष्णतेनेही जीव कासावीस होत आहेत. पिकांच्या जोमासाठी पावसाची गरज व्यक्त केली जात आहे.