शिक्षण विभागाचे सुधारित निकष रद्द करा ः शिरूरच्या तहसीलदारांना निवेदन
शिक्रापूर (पुणे) -राज्य शिक्षण आयुक्तालयाने 13 जुलै 2020 रोजी प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संचमान्यतेचे प्रस्तावित सुधारीत निकष लागू करण्याची अवर मुख्य सचिव यांना शिफारस केली आहे. या निकषामुळे राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने अतिरिक्त ठरणार असून पर्यायाने शिक्षण विकास, गुणवत्ता यास बाधा येऊ शकते. त्यामुळे प्रस्तावित सुधारित संचमान्यतेचे निकष तात्काळ रद्द करावेत, अशा मागणीचे निवेदन शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ व शिरूर हवेली शिक्षक संस्थेने तहसीलदार कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव रामदास थिटे, सहसचिव अशोक सरोदे, शिरूर-हवेली शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, सचिव नितीन माने, पदाधिकारी राजाराम ढवळे, जिल्हा सहसचिव मारुती कदम यांनी शिरूरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांना दिले. याबाबत अधिक माहिती देताना मुख्याध्यापक संघाचे सचिव रामदास थिटे म्हणाले की, प्रस्तावित निकषाप्रमाणे पाचवी ते दहावी शाळा प्रकारात आजच शिक्षक विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरतात.
राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त झाल्यास गुणवत्ता, कर्मचाऱ्यांत गोंधळ व शिक्षण विकासात असमतोल दिसून येईल. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत प्रत्येक शालेय स्तरावर 30 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक अशी तरतूद असल्याने प्रस्तावित निकष राष्ट्रीय धोरणांस विसंगत आहे. कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांची पदेही मंजूर होणाऱ्या एकूण शिक्षकांच्या पदांतर्गतच समाविष्ट असल्याने पदांबाबत समस्या निर्माण होईल.