रत्नागिरी – दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकने मॅक्झिमो गाडीला जोरदार धडक दिल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात बाप-लेकीचाही मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर काहींना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. 25 जून रोजी सायंकाळी हा अपघात झाला आहे. मात्र अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.
खाजगी प्रवासी वाहतूक करणारी टाटाची मॅजिक गाडी दापोलीकडून हर्णेकडे जात होती. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, 8 जणांचा मृत्यू झाला. यावेळी गाडीत 14 प्रवासी होते. या दोन्ही गाड्या जोशी बागेजवळ अवघड वळणावरून जाताना पुढे जाण्यासाठी रस्ताच राहीला नसल्याने ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दापोली पोलीस दाखल झाले होते. अपघात जिथे झाला तिथे स्थानिकांसह वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मॅक्झिमो गाडीचा चालक अनिल सारंग यांचा मृत्यू झाला. याशिवाय मरियम गौफिक काझी ६ वर्षे, स्वरा संदेश कदम ८ वर्षे, अनिल सारंग ४५ वर्षं, फराह तौफिक काझी, २७ वर्ष संदेश कदम, ५५ वर्ष यांचाही यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागात दिवसेंदिवस अपघताचे प्रमाण वाढत चालले आहे. यात अनेक नागरिकांचा बळी जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.