मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील उतारावर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कारमध्ये चालकासह आठ प्रवासी होते. सर्व प्रवासी हे वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबईकडे जाण्यासाठी प्रवास करत होते. कार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावाजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. त्यामध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक महिला किरकोळ जखमी झाली. चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे नेण्यात आले. त्यादरम्यान त्यातील एक जणांचा मृत्यू झाला. चालक आणि इतर दोघा जणांवर उपचार सुरू आहेत.
अब्दुल रहमान खान (३२ रा. घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी (रा.राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (३०, रा. कामोठे. नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (२३ म्हातारपाडा, मुंबई) यांचा मृत्यू झाला असून मच्छिंद्र आंबोरे (३८- चालक), अमीरउल्ला चौधरी, दिपक खैराल हे जखमी झाले आहेत. अस्फीया रईस चौधरी (२५ , कुर्ला, मुंबई) या बचावल्या आहेत.
आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असून अपघात स्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांनीे भेट दिली. या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.





