तक्रारी वाढल्या : उत्पादन खर्च निघत नसल्याने नाराजी
पुणे – दूध ग्राहकांना नववर्षात दूध दरवाढीची भेट मिळाली आहे. गाई आणि म्हशीच्या दूध दरात रविवारपासून (दि.12) ही दरवाढ लागू झाली. त्याचा दूध ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. पण, शेतकऱ्याला मिळत असलेल्या दुधाच्या किंमतीत उत्पादन खर्चही भागत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे दुधाच्या वाढलेल्या दरानंतरही शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात 20 ते 25 टक्के दुधाचे उत्पादन कमी आहे. राज्यात सध्या दररोज दोन कोटी 40 लाख दूध उत्पादन होते. तर, राज्यासाठी दररोज साधारण साडेतीन कोटी लिटर दूध अपेक्षित आहे. राज्यात दररोज 65 लाख लिटर पॅकिंग दुधाची विक्री होते. मात्र, बटर आणि दूध पावडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे बाजारात दूध कमी असल्याने खरेदी दरातही वाढ करण्यात आली. मात्र, दूध दरवाढीनंतरही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भागत नसल्याचे चित्र आहे.
दूध व्यावसायिकांनी विक्रीदरात वाढ केली. तर दुग्धजन्य उत्पादनांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याची खंत व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला 25 ते 31 तर म्हशीच्या दुधाला 40 ते 45 रुपये मिळतात. शेतकऱ्यांसारखीच ग्राहकांची अवस्था आहे.
राज्यातील दूध मोठ्या प्रमाणात बटर आणि पावडरसाठी वापरले जाते. त्यामुळे दुधाचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या वर्षी 130 रुपये असलेली दूध पावडर यंदा 330 रुपये किलोवर गेली. तर बटर 220 वरुन 320 प्रतिकिलो रुपयांवर गेले. मात्र, शेतकऱ्यांना गायीच्या एक लिटर दुधाला केवळ 25 ते 31 रुपये मिळतात.
भार मात्र ग्राहकांवर
दूध व्यावसायिक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. गायीचे दूध 46 रुपयांवरून 48 रुपये, तर म्हशीचे दूध 56 वरून 58 रुपयांवर पोहोचले. तर बटर 320 आणि दूध पावडरच्या 330 रुपये प्रतीकिलोवर पोहोचले. बटर आणि पनीरच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 200 रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे एकूणच भार ग्राहकांवर पडला असला, तरी शेतकऱ्यांनाही नुकसान होत आहे.