पाथर्डी – कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची संस्था आहे. शेतकऱ्यांचे हित साधने संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शेतीमालाच्या भावासंदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासंदर्भात बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांची तत्काळ बैठक घेऊन सूचना द्याव्यात व शेतकऱ्यांच्या हितासाठी दक्ष रहावे असे आवाहन केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऍड. प्रताप ढाकणे यांनी केले.
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सतराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ढाकणे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती बन्सी आठरे होते. संचालक वैभव दहिफळे, बाळासाहेब घुले, किरण शेटे, सिताराम बोरूडे, बाबासाहेब केदार, राजेंद्र गर्जे, सचिव दिलीप काटे, व्यापारी व सभासद उपस्थित होते.
शासनाने जाहीर केलेला हमीभावापेक्षा व्यापारी शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी दराने खरेदी करीत असून नियमबाह्य सूट घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या दैनिक प्रभातच्या वृत्ताची दखल बैठकीत घेण्यात आली. शासनाच्या हमीभावात शेतीमाल खरेदी करणे व्यापाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने हमीभाव केंद्र सुरू करायला हवे याबाबद बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर बाजारभावापेक्षाही कमी दराने शेतीमाल खरेदी केली जाणार नाही.
नियमबाह्य सूट घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. यासंदर्भात तात्काळ व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सक्त सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी भवन बांधण्याबाबत बैठकीत चर्चा होवून विधानसभेच्या आचार सहितसंहितेनंतर या कामाची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीच्या आवारात उन्हाळ्यात धुंराळा उडतो, पावसाळ्यात चिखल होतो याचा बंदोबस्तत करण्याचे आश्वासन आपण निवडणुकीत दिलेले आहे ते लवकर पूर्ण करण्यात यावे अशी सूचना सिताराम बोरुडे यांनी मांडली. मिरी येथे बाजार समिती उभारण्यासाठी जागा घेण्याबाबत व खरवंडी येथे भुईकाटा बांधण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.