कृषीमंत्री बांधावर जाताच शेतकऱ्यांचा घेराव; प्रचंड रोष अन् गंभीर आरोप, दत्तात्रय भरणेंनी लावला अधिकाऱ्यांना फोन म्हणाले… “तातडीने…”

Agriculture Minister Dattatreya Bharane : राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून बळीराजा हवालदिल झाला आहे. मदतीची वाट पाहत आहे. काल मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. तसेच संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार महायुती सरकारमधील सर्व मंत्री पालकमंत्री संबंधित जिह्याच्या पाहणी दौऱ्यावर आले आहेत.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आज जालन्यातील बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. पण यावेळी कृषिमंत्र्यांना गरडा घालत शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाचा सामाना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना सामना करावा लागला.
शेतकऱ्यांनी आपली व्यथा कृषीमंत्र्यांना पुढे मांडल्या. जिल्हाधिकारी मॅडमने फळबागांचे पंचनामे करु नका, असे आदेश दिले असा आरोप शेतकऱ्यांनी केला. खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे प्रशासन करत नसल्याचे ऐकल्यानंतर कृषीमंत्री भरणे संतापले आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांना फोन लावून फैलावर घेतलं. ज्याचं नुकसान झालं आहे ज्यांच नुकसान झालं आहे त्याचं नुकसान घ्या असं भरणेंनी अधिकाऱ्यांना सांगितलं. शेतकरी खूप अडचणीत आहे शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
तुमचा रोष असणं साहजिक आहे, कारण ज्याच जळतं त्याला कळतं. तुमची काय चूक नाही, तुम्ही व्यथा मांडताय तुमची. मात्र, तुमच्या तालुक्यातील आणि गावातील एकाही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही, असं आश्वासन शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांनी दिलं. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, तुम्हाला मदत करु. तुमची जमीन वाहून गेली असेल किंवा विहिरी बुजल्या असतील, अथवा घरांचे नुकसान झाले असेल तर त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
हेही वाचा : ओबीसी आंदोलकाची कार पेटवणारा पोलिसांच्या ताब्यात; आरोपी जरांगेंचा निकटवर्तीय असल्याचा वाघमारेंचा दावा





