मुंबई: पीक कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकर्यांना जाहीर झालेली कर्जमाफी मिळणे तर दूरच उलट शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के दराने व्याज आकारून त्यांची लुटमार चालू आहे. वास्तविक आघाडी सरकारने शेतकर्यांना ० ते २ टक्के दराने पीक कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य झाले नाही त्यांना कर्जमाफी मिळणे आवश्यक होते.
कर्जमाफी मिळाली नाही तरी ० ते २ टक्के यांचा तो हक्क होता. परंतु सध्याचे फडणवीस सरकार शेतकर्यांच्या पुनर्गठीत कर्जावर १२ ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत आहे. यातून शेतकरी आत्महत्या वाढल्या तर त्याचं पापही याच सरकारचं असेल अशी टीका विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी केली.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अधिवेशन सुरू होत असताना वरच्या सभागृहात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे जनतेचे विषय मांडतीलच शिवाय आम्ही खालच्या सभागृहात आवाज उठवणार आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी करणार आहोत.