ताजे, पिंपळोली येथे शेतकऱ्यांची बैठक
कार्ला – महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) ताजे, पिंपळोली, बोरज, टाकवे खुर्द या गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या विरोधात पिंपळोली, ताजे येथील ग्रामस्थांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे.
सरकारने ताजे, पिंपळोली येथील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. या जमीन संपादनास विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी ताजे येथे बैठक घेतली होती. यापूर्वी या गावातील शेतकऱ्यांना पुणे-मुंबई एक्सप्रेस रस्त्यासाठी व डंपिंगसाठी आपली जमीन गेल्याने अल्पभूधारक व भूमिहीन झाले आहेत. आता दुसरे संकट एमआयडीसीचे समोर राहिल्याने शेतकरी पूर्ण दुहेरी कात्रीत सापडला आहे.
आता केवळ गट क्रमांक 1 ते 9 वगळता संपूर्ण क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यामध्ये गावठान व निवासी क्षेत्राचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामुळे पिंपळोली ताजे येथील शेतकऱ्यांची उपजीविकेची साधन असलेली शेती गेली, तर करायचं काय? असा मोठा प्रश्न ताजे, पिंपळोली येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या जमीन संपादनास आमचा तीव्र विरोध असल्याचा सामाजिक कार्यकर्ते सुनील गुर्जर, संजय गांधी निराधार योजनेचे संचालक मच्छिंद्र केदारी, पोलीस पाटील अरुण केदारी, संदीप बोंबले, सुभाष पिंपळे, संभाजी केदारी, चंद्रकांत केदारी यांनी आपल्या भाषणात भूसंपादनास विरोध करत पुढील काही दिवसांत जनआंदोलन करण्याचा निर्धार केला. एमआयडीसी हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला.
या वेळी ताजे, पिंपळोली येथील शेतकरी गणपत केदारी, विष्णू बोंबले, शिवाजी केदारी, दत्तात्रय केदारी, गणेश केदारी, पांडूरंग बोंबले, रुपचंद गायकवाड, संदीप चौरे, संतोष बोंबले, बाबाजी केदारी, बाळासाहेब सुतार, अतू बोंबले, बाळू पिंपळे, पांडूरंग ढमाले, भरत केदारी, भाऊसाहेब केदारी, राजू पिंपळे, भगवान बोंबले यांच्यासह 100 ते 150 शेतकरी उपस्थित होते.
पहिल्या टप्यात टाकवे खुर्द, ताजे, बोरज येथील पाचशे एकर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटिसा मिळाल्या आहेत. आपली बाजू मांडण्याकरिता 26 ऑगस्ट मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ताजे, पिंपळोली येथील बागयती क्षेत्र संपादित होणार आहे.