Farmers March : विद्यार्थ्यांनंतर आता शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा ; शंभू बॉर्डरवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
Farmers March : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

Farmers March : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी हिंसक वळण घेतले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता शेतकरी संघटनांनीही भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. या पार्श्वभूमीवर राजधानीत आणि संसद परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दिल्लीतील किसान घाट येथे आज पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांतील हजारो शेतकरी महापंचायतीसाठी एकत्र येणार आहेत. यावेळी ट्रॅक्टरऐवजी बस आणि खासगी वाहनांद्वारे शेतकरी दिल्लीत दाखल होणार आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हरियाणा प्रशासनाने पंजाब-हरियाणा दरम्यानची शंभू सीमा पूर्णपणे सील केली आहे.
शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, भारत-अमेरिका व्यापार करारामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती असून शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा करार मागे घ्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
मंगळवारी पहाटेपासून पंजाबमधील फतेहगड साहिबसह विविध भागांतून शेतकऱ्यांचे ताफे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. सरकारपर्यंत शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. वाटेत अडथळे आले तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या दिल्ली कूचच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारले आहेत. पंजाब आणि हरियाणाला जोडणाऱ्या घग्गर पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून राष्ट्रीय महामार्गांवर अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या घडामोडींमध्ये भारतीय किसान युनियन (बीकेयू)चे नेते गुरनाम सिंग चारुनी आणि राकेश बेन्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी अंबालाजवळील शंभू टोल प्लाझा आणि हिसार-चंदीगड महामार्गावर आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.






