राहुरी – लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व उद्योग धंदे, व्यापार बंद आहे. शेतमजुरांच्या उपलब्धतेची समस्या असतानाही त्यावर मात करीत शेतकरी शेतीतील कामांमध्ये सध्या व्यस्त आहेत. बहुतांशी जनजीवन ठप्प असतानाच शेती व शेतीतील कामे मात्र सुरुच आहेत.
लॉकडाऊनमुळे शेतमजुर सहजपणे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे घरातील उपलब्ध मनुष्यबळाचा उपयोग करून शेतातील काम करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. लॉकडाऊनने शेतीतील समस्या वाढलेला आहेत. तरीही शेतीतील कामे मात्र सुरु आहेत.
आता शेतीतील कामांनी वेग घेतला आहे. विशेषतः गव्हाची कापणी, मळणी अशी कामे घरीच घरातील कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शिलेगाव येथील अनिल म्हसे यांनी पूर्ण केली. तसेच घरातील कुटुंबांच्या मदतीनेच दोन एकराचा कांदा काढणी केली. घरच्या जनावरांसाठी गावरान घासाचे पाणी भरणी, कापणी, ऊसाचे पाणी भरणे, खते देणे ही शेतातील कामे सर्वसाधारणपणे सुरु आहेत.
पिंपरी अवघड येथील विजय कांबळे यांनी व्यापारी तत्त्वावर घास केला आहे. शेतमजुरांची समस्या असतानाही घासकापणी, तसेच उसासाठी खते देण्याचे काम केले.
मका, उसासाठी पाणी भरण्याची कामे चालू आहेत. तांदूळवाडी येथील प्रसाद पेरणे यांनीही घरातील सदस्यांच्या मदतीने गव्हाची काढणी, मळणी केली. तसेच कपाशीसाठी मशागतीची कामे देखील सध्या सुरू आहेत. कपाशीसाठी शेतांच्या मशागती सुरु आहेत. ब्राह्मणी येथील सचिन ठुबे यांनी अडीच एकरातील टरबुजाच्या विक्रीचे समस्या लॉकडाऊनमुळे गंभीर झाली असतानाही सोडवली.
सोशल मीडियाचा आधार घेत मानोरी, वळण, चंडकापूर, आरडगांव, केंदळ आदी परिसरातील हजारो उपभोक्ता ग्राहकांशी व्हाट्सऍपद्वारे संपर्क साधला व फळाच्या आकारानुसार बारा, दहा व सात रुपये याप्रमाणे फळांची थेट ग्राहकांना विक्री केली. दहाटन टरबूजाची विक्री लॉकडाऊनमध्ये सामाजिक भान राखत केली. सोशल डिस्टन्स, सॅंनिटायझरने हात धुण्याकडे लक्ष देत फळांची विक्री केली. शेतातील अनेक कामांमध्ये मजुरांची समस्या तीव्र असतानाही त्यावर मात करीत शेतातील कामांचे व्यस्त वेळापत्रकात शेतकरी सध्या मग्न आहेत.