शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक – यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही. कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला अजित दादांनी सांगितले असा सांगा, आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी काही केले नसल्याची टीका सरकारवर होत होती. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला.
राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना वीजेवर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे ते म्हणाले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील –
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून झाली आहे. यावेळी पवार म्हणाले, मी दहा वर्ष राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे. मी दहा अर्थसंकल्प मांडलेत. त्यामुळे कुठे बचत करून योजनांना पैसा देता येतो, हे मला माहिती आहे. लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्ष सुरू राहील, असेही ते म्हणाले.





