कातरखटाव : कान्हरवाडी (ता.खटाव) येथील स्वस्त धान्य दुकानात लोकांच्या रांगा लागल्याने सोशल डिस्टन्स’चा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. संबंधित दुकानदाराने लोकांना कोणत्याही सुचना केल्या नव्हत्या तसेच सोशल डिस्टन्स पाळला जाईल याची खबरदारी घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कान्हरवाडी हे खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील छोटेशे खेडे आहे. या ठिकाणी सरकारच्या आदेशानुसार गावातील लोकांना धान्याचे वाटप सुरू होते. मात्र, हे करताना लोकांच्यात सुरक्षित अंतर राहील अथवा लोक गर्दी करणार नाहीत याची काळजी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराने घेणे गरजेचे होते.
एका छोट्याशा खेड्यात ते शक्य ही झाले असते. मात्र, प्रत्यक्ष तसे काहीच न केल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सरकारच्या करोना रोखण्याच्या मोहिमेला हरताळ फासण्याची कृती केल्याचे दिसून आले. त्यामुळे काही स्थानिकांनी भिती व्यक्त करुन बेफिकिरपणे स्वस्त धान्याचे वाटप करणार्या त्या दुकानदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.