#WTC21 | बुमराहचे अपयश न्यूझीलंडच्या पथ्यावर

साउदम्पटन – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला येत असलेले अपयश सध्या भारतीय संघाची डोकेदुखी ठरत आहे.
बुमराह याने ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये अफलातून कामगिरी केली होती. मात्र, तेच सातत्य त्याला या सामन्यात दाखवता आलेले नाही. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना वातावरणाचाही त्याला कोणताही लाभ घेता आला नाही. गेल्या अनेक सामन्यात बुमराहने सातत्याने फलंदाजांना अडचणीत आणले होते. या सामन्यात मात्र त्याची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची होत आहे.
त्याने धावांची गती रोखली असली तरीही त्याला बळी मिळवण्यात येत असलेले अपयश संघासाठी चिंतेची बाब ठरली आहे. 2020 साली झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यापासून बुमराह अपयशी ठरत होता.
या मालिकेत त्याने 4 कसोटीत केवळ 6 बळी मिळवले होते. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी बुमराहने 12 कसोटीत 62 बळी घेतले होते. त्याची सरासरी प्रत्येक कसोटीत 5 बळी अशी होती. मात्र, त्यानंतर गेल्या सात कसोटीत त्याला अपयश येत आहे.





