औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनला विरोध करणारीही भूमिका मांडली. आंबेडकर म्हणाले, पाच टक्के लोकांसाठी 95 टक्के लोकांना वेठीला धरणे अयोग्य आहे. लोकांनी लॉकडाउनचे नियम तोडून आपले व्यवहार सुरळीत करावेत, अशी भूमिकाही त्यांनी पुन्हा एकदा मांडली.
प्रकाश आंबेडकर यांनी परवाच अकोल्यात न्हाव्याकडे जाऊन केस कापून घेतले आणि लॉकडाउनला विरोध दर्शवला. लॉकडाउन असाच कायम राहिला तर करोनापेक्षा लोक उपासमारीने मरतील. लॉकडाउनचा सगळ्यात मोठा फटका हा कामगार आणि पारंपारिक व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यांना सरकारने मदत केली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी आज केली.