आरिफ शेख
रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे मारियुपोल उद्ध्वस्त झाले आहे. युद्धातून वाचलेल्यांना क्षणाक्षणाला मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. जगण्या-मरण्याची सीमारेषा पुसट झाली आहे.
रशियन हल्ल्यात युक्रेनचे मारियुपोल नरक बनले आहे. बॉम्बहल्ल्यात अडीच हजारांहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी एरेस्टोविच यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मारियुपोलमधील विध्वसांचे धक्कादायक ड्रोन फुटेज आणि उपग्रह प्रतिमा समोर आल्या आहेत. यामध्ये रशियन बॉम्बफेकीनंतरच्या विध्वंसाचे दृश्य दिसते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहरात सुमारे साडेतीन लाख लोक अडकले आहेत. वीज, पाणी, औषध यांसारख्या जीवनावश्यक गोष्टींशिवाय त्यांना जगावे लागत आहे. गॅसही उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत उणे पाच अंश तापमानात जीव वाचवणे हे या लोकांसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. मारियुपोल हे शहर दोन आठवड्यांपासून रशियन सैन्याने वेढले आहे.
मारियुपोल सिटी कौन्सिलने सांगितले, की सुमारे दोन हजार लोक शहरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत. याशिवाय शहराबाहेरील महामार्गावर दोन हजारांहून अधिक वाहने उभी आहेत. मारियुपोलला गेल्या 17 दिवसांपासून रशियाच्या सैन्याने वेढले आहे. इथून लोकांना बाहेर काढण्यासाठी “सेफ्टी कॉरिडॉर’ही बांधण्यात आला होता; पण हा कॉरिडॉरही फार काळ चालला नाही. लोक आता मारियुपोल सोडू शकतील की नाही, हे सांगणे कठीण आहे. रशियन सैनिकांनी येथील रुग्णालयांनाही लक्ष्य केले आहे. सुमारे 225 किलोमीटर दूर असलेल्या झापोरिझिया भागात पळून जाण्यात यशस्वी झालेल्या दोन महिलांनी मारियुपोलमधील भीषण परिस्थितीबद्दल सांगितले. त्यातील लीडिया एक. रशियन बॉम्ब तिच्या घराजवळ पडत आहेत. कानठळ्या बसवणारे आवाज आणि सातत्याने मरणाची भीती. त्यामुळे जगणंच अवघड झाले होते. मृत्यू कधीही येईल, असे वाटत होते. त्यानंतर तिने मारियुपोल सोडण्याचा निर्णय घेतला.
लीडिया म्हणाली, गोळीबाराच्या वेळी आम्हाला शहर सोडावं लागलं. तिथं सतत गोळीबाराचे आवाज ऐकू येतात. आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी बोललो, त्यांनी सांगितलं की सध्या परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लोक आता मारियुपोल सोडू शकतील की नाही हे कोणालाच माहीत नाही. 60 लोकांसह तळघरात आश्रय घेतला. अनेकांना तळघरात आसरा घ्यावा लागत आहे. दोन आठवडे ती व तिच्यासोबतचे साठ लोक तळघरातच थांबून होते. ती क्वचितच तिच्या अपार्टमेंटमध्ये वस्तू घेण्यासाठी जात असे. रशियन विमाने खूप कमी उंचीवरून जात होती. त्यांचा आवाज भयभीत करणारा होता. आम्हाला सतत हल्ल्याची भीती वाटत होती. त्यामुळे अनेक वेळा मुलांना लपवावे लागले. मुलांचं खेळणं बंद झालं. सर्वांची अवस्था कोंडलेल्या जनावरांसारखी झाली होती. लीडियाबरोबरची दुसरी एक महिलाही आपलं दुःख लपवू शकत नाही. तिनंही आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला.
ती म्हणते, की मारियुपोलमध्ये राहणं आता शक्य नाही. रशियन गोळीबारामुळे सर्वत्र मोठमोठे खड्डे तयार झाले. स्वितलाना सांगते, की तिने 17 लोकांना तिच्या घरात आश्रय दिला होता. घरात प्यायला पाणी नाही. गॅस नाही. धान्य नाही. कसे तरी पाणी जमा करून, त्यात सूप शिजवण्याची वेळ आल्याचे ती सांगते. स्वितलाना म्हणाली, जेव्हा युद्ध सुरू झालं, तेव्हा मला शहर सोडायचं नव्हतं; परंतु जेव्हा 24 तास बॉम्बस्फोट सुरू झाले, तेव्हा तिथं राहणं कठीण झालं. शहरातील शेवटचं किराणा दुकानही उद्ध्वस्त झालं होतं. रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे जिकडं तिकडं आग आणि धूर दिसत आहे.
मारियुपोल हे औद्योगिक शहर आहे. स्वितलानाचा मुलगा मारियुपोलमध्ये आहे. तिला तिच्या मुलाची खूप काळजी वाटते. त्यानं तिथंच राहण्याचा निर्णय घेतल्यानं तर ती अधिक चिंतेत आहे. शहरात अजूनही अनेक लोक अडकले आहेत. तिनं शेजाऱ्यांना शहर सोडण्यास सांगितलं; परंतु त्यांना भीती वाटते, की देशात सर्वत्र असंच चित्र आहे. बाहेर जाऊनही सुरक्षितपणे राहता येईल का, याची भीती वाटते. कष्टाने उभे केलेले घर डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना पाहून अनेकांना रडू कोसळत आहे. शहरातील शेवटच्या किराणा दुकानावर बॉम्बस्फोट झाला. आता लोक कसे जगत असतील, याची स्वितलानाला चिंता आहे. रशियन सैनिकांनी लोकांना रुग्णालयात कैद केलं आहे. रशियन बॉम्बस्फोटानंतर एक निवासी इमारत उद्ध्वस्त झाली. इमारतीसमोर उभी असलेली कारही फोडण्यात आली. डोनेस्तक प्रादेशिक प्रशासन प्रमुख पावलो किरिलेन्को यांनी आरोप केला, की रशियन सैन्याने मारियुपोलच्या प्रादेशिक अतिदक्षता रुग्णालयात लोकांना कैद केले. डॉक्टर आणि रुग्णांना बळजबरीने तिथे थांबवण्यात आले आहे.
रशियन हल्ल्यानंतर रुग्णालय कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदललं. किरिलेन्को म्हणाले, की रुग्णालयातून बाहेर पडणं अशक्य आहे. पळून जात असलेल्यांना रशियन सैन्य गोळ्या घालतं. त्यामुळे गोळीबारात मरायचं, की अन्नपाण्यावाचून तडफडून मरायचं एवढा एकच पर्याय मारियुपोलच्या नागरिकांपुढे आहे. दोन दिवसांपासून गाडी दवाखान्यात जाऊ शकलेली नाही. आजूबाजूला उंच इमारती जळत आहेत. रशियन सैन्यानं जवळपासच्या इमारतींमधून सुमारे 400 लोकांना हाकलून लावले आहे. ते आता कुठेही जाऊ शकत नाहीत. अनेक दिवसांपूर्वी काही रुग्णालयं उद्ध्वस्त झाली, तरीही डॉक्टर मंडळी तळघरात रुग्णांवर उपचार करत आहेत. मारियुपोलच्या नागरिकांचा असा जीवन-मरणाचा संघर्ष सुरू आहे. एका चांगल्या, संपन्न शहराचं नरकात रुपांतर झालं आहे.