पक्षनेते नामदेव ढाके यांचा शासनावर आरोप
पिंपरी – परराज्यातील नागरिकांना संबंधित राज्याच्या सीमेपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून एसटीची मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, नागरिकांसाठी पैसे भरूनही सेवा दिली जात नाही. ही महाराष्ट्रातील नागरिकांची घोर निराशा असून विविध ठिकाणी अडकेलेले महाराष्ट्रीयन नागरिक राज्य शासनाला कधीच माफ करणार नाहीत, असा आरोप महापालिकेतील सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.
याबाबत ढाके यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, 21 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांची गेल्या दीड महिन्यांपासून राहण्याची, खाण्याची तारांबळ होत आहे. लॉकडाऊन संपेल या अपेक्षेवर असलेल्या नागरिकांना राज्य शासनाने सुरुवातीला आंतरजिल्हा प्रवासासाठी मोफत बस उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले, त्यानंतर 44 रुपये प्रतिकिलोमीटर पैसे भरून बस उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले मात्र आता पैसे भरूनही बस उपलब्ध करून न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एका बाजूला परराज्यातील नागरिकांसाठी मोफत सुविधा दिली जात असताना राज्यातील विविध ठिकाणी अडकेलेल्या नागरिकांबाबत घेतलेले निर्णय बदलण्यात येत असल्याने या नागरिकांची घोर निराशा आणि फसवणूक शासनाने केली आहे. सातत्याने बदलणाऱ्या निर्णयामुळे संबंधितांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या लोकांमध्ये संभ्रमावस्था व गोंधळ निर्माण झाला आहे. या नागरिकांची थट्टा करून त्यांना वेठीस धरणाऱ्या शासनाने या नागरिकांना आंतरजिल्हा प्रवासाची तात्काळ एसटीमार्फत सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही या पत्रकात ढाके यांनी म्हटले आहे.