नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाशी संबंधित सुमारे 678 पाने आणि अकाउंट फेसबुकने हटवली आहेत. ही पाने आणि फेसबुक खाती सामुहिकपणे केलेले अप्रमाणिक वर्तन होते, असे फेसबुकने म्हटले आहे. लोकसभा निवडणूकीसाठीच्या मतदाना अवघे 2 आठवडे शिल्लक राहिले असताना फेसबुकने कॉंग्रेसच्या विरोधातले हे पाऊल उचलले आहे.
“डिलीट’ करण्यात आलेल्या 689 पाने आणि खात्यांपैकी बहुतेक फेसबुक पाने आणि खाती फेसबुकच्या ऑटोमेडेड सिस्टीमद्वारे अवैध म्हणून ओळखली गेली आणि निलंबित केली गेली होती, असे फेसबुकच्या सायबर सिक्युरिटी पॉलिसीचे प्रमुख नाथनील ग्लिचर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या फेसबुक खातेधारकांच्या वर्तनाच्या आधारे ही खाती रद्द करण्यात आली आहेत. त्या खात्यांवरील मजकूराचा त्यासाठी विचार केला गेलेला नाही, असेही ग्लिचर यांनी म्हटले आहे. रद्द केलेल्या खात्यांचे खातेधारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीची बदनामी करण्यासाठी खोटा मजकूर वितरीत करत असत. त्यासाठी ही बनावट खाती चालवली जात असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या खात्यांच्या मालकांनी आपली ओळख उघड करण्यास टाळाटाळ केली आहे. या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ‘आयटी सेल’शी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. फेसबुकने अशी 15 फेसबुक खाती, पाने, ग्रुप आणि लिंक डिलीट केली असून ती “सिल्व्हर टच’ या भारतीय आयटी कंपनीशी संबंधित आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.
मात्र कॉंग्रेस पक्षाने फेसबुकचा हा दावा अमान्य केला आहे. फेसबुकने केलेला दावा तपासून बघून मगच यावर प्रतिक्रिया दिली जाईल, असे पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी म्हटले आहे.