कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करायला वाढीव मुदत

इस्लामाबाद – हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करायला पाकिस्तानने भारताला वाढीव मुदत दिली आहे. लष्करी न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करण्याच्या सुनावणीसाठी भारताकडून वकील नियुक्त केला जाणे बाकी आहे.
भारतीय नौदलातून निवृत्त झालेले अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये दहशतवाद आणि हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला या आदेशांचा पारदर्शक पद्धतीने फेरविचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्या निर्देशांनुसार जाधव यांना भारतीय दूतावासाचे सहकार्य उपलब्ध करून देण्याचे बंधनही पाकिस्तानवर घालण्यात आले आहे. मात्र भारताकडून वकील नियुक्त करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या संदर्भात भारताशी संपर्क करण्याचे आदेश 5 मे रोजी दिले गेले असल्याचे पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल खलिद जावेद खान यांनी न्यायालयात सांगितले.
भारताकडून या संदर्भात कोणताही प्रतिसाद आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर पुन्हा एकदा बारताशी संपर्क करण्याची सूचना न्यायालयाने केली आणि कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्यासाठीची मुदत वाढवल्याचे सांगितले.
दरम्यान जाधव यांच्यावरील खटल्याचा फेरविचार करण्यासाठी करण्यात आलेल्या विधेयकातील त्रुटींकडे बारताने पाकिस्तानचे लक्ष वेधले आहे. प्रस्ताविक कायद्यानुसार “आयसीजे’च्या निर्देशांनुसार जाधव यांच्या खटल्याचा फेरविचार करण्याची यंत्रणा केली जाऊ शकत नाही, असे भारताने म्हटले आहे.

