कोलकता : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मे अखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला तज्ञांनी आणि डॉक्टरांनी दिला असल्याचे सूतोवाच बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. तशातच इतर राज्यांकडूनही मिळणारे संकेत पाहता करोनाचा फैलाव अधिक असणाऱ्या भागांत तरी लॉकडाऊन लांबण्याची चिन्हे बळावली आहेत.
करोना संकट केव्हा संपेल हे कुणीच सांगू शकत नाही. अनेक देशांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत तर काहींनी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचे जाहीर केले आहे. करोना संकटाशी संबंधित निर्बंध मेअखेरपर्यंत कायम राहावेत असे आपल्या तज्ञांना आणि डॉक्टरांनाही वाटते. मेनंतर करोना फैलावाचे प्रमाण घटू शकते.
मात्र, पावसाळ्यात ते प्रमाण पुन्हा वाढू शकते, असा इशारा ममतांनी तज्ञांच्या हवाल्याने येथे पत्रकारांशी बोलताना दिला. सध्याच्या पेचप्रसंगात भाजप राजकारण करण्यात मग्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. करोनामुळे पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या स्थितीवरून भाजप आणि ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये सातत्याने शाब्दिक युद्ध होत आहे. त्या राज्यात 600 हून अधिक करोनाबाधित आढळले आहेत.