खर्च पिंपरी चिंचवड महापालिकेचा; कारवाई मात्र हद्दीबाहेर ! देहुत भविकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

देहूगाव – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्चून वाहतूक पोलिसांना कारवाईसाठी टेम्पो उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार तळवडे वाहतूक शाखेलाही दुचाकींवर कारवाईसाठी टेम्पो देण्यात आला आहे. मात्र या टेम्पोतून महापालिकेच्या हद्दीबाहेर देहूगावात कारवाई केली जाते. त्यामुळे खर्च महापालिकेचा अन् कारवाई मात्र हद्दीबाहेर, असे चित्र दिसत आहे.
देहुगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने देहूत दररोज हजारो भाविकभक्त दर्शनासाठी चारचाकी व दुचाकी वाहने घेऊन येत असतात. मंदिराच्या समोर असलेल्या रस्त्याच्या बाजूला जागा दिसेल तिथे वाहने लावतात. परंतु, हे भाविकभक्त मंदिरात दर्शनासाठी गेले असता, तळवडे वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन येते आणि अनधिकृत पार्किंग केलेली दुचाकी वाहने उचलून नेतात. भाविकभक्त दर्शन करून आल्यानंतर वाहन गायब झाल्याचे दिसून येते. आपले वाहन चोरीला तर गेले नाही ना, अशी शंका त्यांना येते. आसपास चौकशी केल्यावर तळवडे वाहतूक पोलिसांनी दुचाकी उचलून नेल्याचे समल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडतो. मग तळवडे येथे जावून दंडाची पावती फाडून वाहने सोडविली जातात. यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होतो. भाविकभक्तांना पोलीस कारवाईचा करावा लागणारा सामना आणि नाहक सोसावा लागणारा भुर्दंड यामुळे भाविकभक्त नाराजी व्यक्त करीत आहेत.
मुळात देहूगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत चालला आहे. या वाहतूकीला शिस्त लागावी, हे देखील खरे आहे. मात्र त्यासाठी देहू नगरपंचायतीने भाविकांसाठी स्वतंत्र पार्किंग उपलब्ध करून द्यावे. ज्यामुळे नगरपंचायतीचे उत्पन्नही वाढेल आणि भाविकांना मनस्तापही सहन करावा लागणार नाही.
देहूगावमध्ये दररोज हजारो भाविक भेट देत असल्याने याठिकाणची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र ती नसल्याने भाविक आपली स्वतःची वाहने घेऊन येतात. तसेच सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने ग्रामस्थांनीही आपली स्वतःची वाहने घेतल्याने येथील वाहतूक कोंडीत भरच पडत आहे.
टोइंग ऐवजी ऑनलाइन दंडाची कारवाई करावी
देहूमध्ये वाहतूकीला शिस्त लावायची असेल देहू नगरपंचायतीने किंवा वाहतूक पोलिसांनी एक स्वतंत्र कर्मचारी तिथे नियुक्त करणे अपेक्षित आहे. ज्यावेळी भाविक वाहने पार्क करतात त्यावेळी त्यांना वाहनावर कारवाई होईल, अशी सूचना देणे गरजेचे आहे. त्यानंतरही वाहन पार्क केल्यास पोलिसांकडून अशा वाहनावर ऑनलाइन पद्धतीने कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे भाविकांना आपली वाहने आणण्यासाठी तळवडे येथे जाण्याची गरज पडणार नाही आणि ऑनलाइन दंडामुळे वाहन चालकाला अर्थिक झळही पोचली जाईल.





