अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प
सातारा – महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुकारलेल्या जिल्हा बंदला सातारा शहर वगळता इतरत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साताऱ्यात बंदचा परिणाम जाणवला नाही. अपवाद वगळता शहरातील व्यवहार सुरळीत सुरू होते. खंडाळा, कराड, वाई, खटाव, माण, पाटण, फलटण, जावळी तालुक्यात अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला.
सातारा व कराड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सातारा शहरात बहुतेक दुकाने सकाळपासून उघडण्यात आली होती. काही ठिकाणी दुकानदारांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद केली होती. राजवाडा, मोती चौक, बसस्थानक परिसरातील काही दुकाने बंद होती. बाजारपेठेत असलेली मंदी, गेल्या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी आजच्या बंदमध्ये भाग घेतला नाही. कपड्यांची दुकाने, हॉटेल्स, भाजी मंडई, शाळा, महाविद्यालये, रिक्षा, बससेवा सुरू होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी पोवई नाका व राजवाडा परिसरात बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी राष्ट्रवादी भवनासमोर निदर्शने केली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार व कार्यकर्ते उपस्थित होते. मी दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली. शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाण्याचा निर्धारही शरद पवार यांनी केला होता. पवारांवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने रहिमतपूर व फलटण शहर वगळून सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारीही निदर्शन केली होती.