करोनाची परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेणार
मुंबई : करोना विषाणूचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डिएड, बीएड, इंजिनिअरिंग तसेच वैद्यकिय महाविद्यालय आणि विद्यापिठस्तरावरील 31 मार्चपूर्वी नियोजित असलेल्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे दिली.
26 ते 27 मार्चच्या दरम्यान करोनाबद्दलची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयातील पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी ही माहिती दिली. करोनाचा फैलाव लक्षात घेऊन राज्य सरकारने महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे.
आता 31 मार्चपर्यंत सर्व विद्यापीठे तसेच परवानगी असलेले खासगी क्लासेस बंद राहणार आहेत. या निर्णयाचे सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी तंतोतंत पालन करावे, असे सामंत म्हणाले. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यातून जे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले आहेत त्यांच्यावर देशात परत येण्यास निर्बंध घालण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
घरून काम करण्याची मुभा
सर्व सरकारी, अनुदानित, खासगी शिक्षण संस्था, महाविद्यालये, अकृषिक विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठ, तंत्र निकेतन, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कला महाविद्यालयातील सर्व अध्यापक 25 मार्च 2020 पर्यंत घरी राहून काम करू शकतील, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.