मागीलवर्षी पुण्याला 98 कोटी रुपयांचा निधी कमी मिळाल्याचे सांगत टीका
पुणे – मागील आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्याला एकूण अंदाजपत्रकाच्या तब्बल 98 कोटी रुपयांचा निधी कमी मिळाला. जिल्ह्याला एकूण 619 कोटी रुपयांचा निधी असताना, केवळ 521 कोटी रुपये एवढाच निधी मिळाला. हा निधी कमी नसून 98 कोटी म्हणजे खूप मोठी तफावत आहे. “आज तत्कालिन पालकमंत्री बापट साहेब उपस्थित नाहीत, अन्यथा ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असती.’ असे सांगून पालकमंत्री अजित पवार यांनी निधी कपातीचा चेंडू गिरीश बापट आणि भाजपच्या कोर्टात ढकलला.
विधानभवन येथे विविध जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. सत्तेवर असताना आपण संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून काम करायचे असते.
जेवढा निधी दरवर्षी मिळतो, तेवढाच निधी मिळायला पाहिजे होता, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. रस्ते वाहून गेले असून, ते नवीन बनवण्यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला आहे. कोल्हापुरात 1 लाख रुपयांपर्यंत पूरबाधितांना मदत करण्यात आली आहे. त्यासाठी मान्यता आणि बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात आली आहे. सांगली परिसरात पाऊस पडल्यावर पूरपरिस्थिती निर्माण होते. याबाबत आपण अलमट्टी धरणाचे कारण देतो.
याचा अभ्यास आपल्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या पथकाने केला असता कर्नाटकात एक पूल झाला आहे. त्या पुलाचे पाणी जाण्याचे कॉलम कमी असल्याने पाणी तेथे अडले जाते. ही तांत्रिक बाब असून, याबाबत कर्नाटकशी पत्रव्यवहार करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पूरपरिस्थिती बाहेरून बोटी मागवाव्या लागतात.
मात्र, सांगली भागात काटेरी झाडे असल्याने अनेकदा या बोटी पंक्चर होतात. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या नव्या बोटींची व्यवस्था करणार असून, त्या चालवण्यासाठी गावातीलच स्थानिक मुलांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच या भागासाठी लाइफ जॅकेट घ्यायला मंजुरी देण्यात आली आहे. सांगलीतील दुष्काळग्रस्त भागात पाणी आणण्यासाठी सांगलीचे सुपुत्र व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे स्वत: या कामात लक्ष घालत आहेत. त्यासंदर्भात त्यांनी बैठकही घेतली आहे, असे पवार यांनी सांगितले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात चांगले ऑडिटोरियम उभे करण्यासाठी आणि विकासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद
राजर्षि शाहू महाराजांच्या स्मारकासाठी निधी देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेणार आहे.
इचलकरंजीतील इंदिरा मेमोरिअल आणि रंकाळा,
कळंबा तलावाच्या कामासाठीही निधीची तरतूद
कास तलावाची उंची वाढवणे, यात्रा विकास,
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी
सज्जनगडावर रोप वे आणि साताऱ्यातील मेडिकल
महाविद्यालयालाही निधी देणार
आदिवासी आश्रम शाळांसाठी सेंट्रल किचन करण्याचा विचार