प्रभात वृत्तसेवा पुणे – यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे अद्याक्षरांच्या क्रमानुसार मतदान यंत्रांवर घेतली जात होती. आता यामध्ये बदल करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना मतदान यंत्रावर पहिले स्थान मिळणार आहे. त्यानंतर राज्य स्तरावरील पक्षातील उमेदवारांचे नाव असणार आहे. लवकरच निवडणूक आयोगाकडून यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.मतदारांना विशिष्ट राजकीय पक्षाचे उमेदवार ओळखण्यास मदत व्हावी आणि त्यांचा गोंधळ टाळता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अनेकदा समान आडनावे किंवा नावाच्या आद्याक्षरामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. तो या नव्या पद्धतीमुळे दूर होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची नावे मतदान यंत्रांवर अर्थात ईव्हीएम मशिनवर घेण्याचे प्राधान्यक्रम ठरले आहेत.त्याच धर्तीवर आता हीच पद्धत निवडणूक आयोगाकडून स्वीकारली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे मतदानाची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांना, पक्षाच्या चिन्हावरून उमेदवाराची ओळख तत्काळ पटवणे सोयीचे होईल. हा बदल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपासून लागू होणार असण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. असे असणार उमेदवारांचे क्रम मतदान यंत्रांवर पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावरील पक्षांकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अद्याक्षरांच्या क्रमानुसार घेतली जाणार आहे. त्यानंतर राज्य स्तरावरील पक्षांकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे असतील. त्यानंतर नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवारांची नावे म्हणजे ज्या राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे नोंदणी आहे. परंतु ज्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही, त्या उमेदवारांची नावे क्रमाने घेतले जातील. यानंतर अपक्ष उमेदवारांची नावे असतील. उमेदवाराचे नाव मतदान यंत्रावर घेताना त्या गटातील उमेदवारांची नावे त्यांच्या नावाच्या अद्याक्षराप्रमाणे मराठी लिपीतील क्रमानुसार घेतली जाणार आहेत.