मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आता ते प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहे. तसंच युपीएसंदर्भात उद्धव ठाकरे योग्यवेळी भूमिका मांडतील असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत यांनी राहुल गांधी भेटीत विरोधकांना एकत्र आणण्यासाठी राहुल यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी अशक्य असल्याचा पुनरूच्चार राऊत यांनी या भेटीनंतर बोलताना केला होता. दरम्यान पत्रकारांनी राहुल गांधी आणि शरद पवारांचा उल्लेख करत यासंबंधी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “राहुल गांधींनी पुढाकार घेतला याचा अर्थ शरद पवारांनी घेऊ नये असा होत नाही, असे त्यांनी म्हटले.
तसेच शरद पवारांच्या उंचीचा नेता आज राजकारणात नाही. आजही देशातील सर्व प्रमुख, राजकीय पक्षांचे नेते हे शरद पवारांना आदर, मान देतात ते आम्हा सर्वांसाठी महत्वाचा आहे. राहुल गांधींच्या चर्चेतही हा विषय आला होता,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी यावेळी, “इतकं गंभीरपणे घेण्याचं कारण नाही. ही वक्तव्यं नैराश्यातून, वैफल्यातून येत असतात, त्यामुळे त्यांना गंभीरतने घेण्याची गरज नाही. उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल. त्यांची प्रकृती नीट राहावी म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्रात कोण कोणाला खांद्यावर देऊन वाढवत होतं हे संपूर्ण देशाला माहिती आहे. माझ्या उत्तराने अनेकांची प्रकृती ढासळेल, म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य आणि खासकरुन विरोधकांचं आरोग्य चांगलं राहावं अशी माझी अपेक्षा आहे,” असे खोचक पद्धतीने त्यांनी उत्तर दिले.
“राहुल गांधी आणि आमची नेहमी भेट होत असते. महाराष्ट्रातील घडामोडींसंबंधी ते नेहमी माझ्याकडून माहिती घेत असतात. प्रियंका गांधी यांच्याशी पहिल्यांदाच राजकीय भेट होत आहे. भेटायला काहीच हरकत नाही, त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत. त्यांनी भेटण्यासंबंधी इच्छा व्यक्त केल्यानंतर मी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार आज मी त्यांना भेटत आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
“मी शिवसैनिक असून हे सूचनेनुसार आणि आदेशानुसारच करत असतो. ज्या घडामोडींमध्ये आम्ही सहभागी होत असतो त्याची माहिती पक्षप्रमुखांना देत असतो,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
“शरद पवारांना या भेटींविषयी काही शंका नाहीत. काल संध्याकाळी शरद पवारांशीही माझी चर्चा झाली. राहुल गांधींना भेटण्याआधीही त्यांच्याशी चर्चा केली. कारण आम्ही एकत्र असून एकमेकांच्या मनात आहोत. म्हणूनच राज्यातील सरकार सुरळीत सुरु आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितले.