पुणे – जगातील प्रत्येक व्यक्ती “युनिक’ असून, आपल्या कामाप्रती निष्ठा, प्रामाणिपणा आणि पवित्रता ही यशाची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन “बीव्हीजी’चे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड यांनी केले.
“शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग’मध्ये स्व. नलीनचंद्र फुलचंद गांधी यांच्या 28 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित
“सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार’ समारंभात येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बोर्डिंगचे विश्वस्त चकोर गांधी, बोर्डिंग अधीक्षक सुरेंद्र गांधी, मिलिंद फडे, अनुराधा गांधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या छात्र पुरस्कार सोहळ्याचा मानकरी अभिषेक लोहाडे हा विद्यार्थी ठरला असून, या पुरस्कारासाठी 18 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या पुरस्कारासाठी बोर्डिंगचेच 1995 चे पहिले पुरस्कारप्राप्त ठरलेले माजी विद्यार्थी सुशील बारमेचा आणि सचिन जैन, सुयश जैन यांच्या निवड समितीने काम पाहिले. या सर्वांचा सन्मान यावेळी चकोर गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.
गेली 28 वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असून, या जैन बोर्डिंगमध्ये आतापर्यंत 8 हजार विद्यार्थी शिकून गेले असल्याचे बोर्डिंग अधीक्षक सुरेंद्र गांधी यांनी सांगितले. तसेच पर्युषण पर्वाचे अठरा दिवस येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
याचबरोबरच पुरस्कार हा येथील विद्यार्थ्यांच्या जीवनातील “टर्निंग पॉइंट’ असल्याचे विश्वस्त चकोर गांधी यांनी सांगत पुरस्कारप्राप्त विद्यार्थी अभिषेक लोहाडे यासह सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन जयेश पहाडे, पलक कासलीवाल, तन्मय कासलीवाल, नमन गंगवाल, सिद्धेश कान्हेड, हिमांशू जैन, अरिंदम जैन या विद्यार्थ्यांनी केले.