मांजरी, पुणे (विवेकानंद काटमोरे) – दिवंगत गोपीनाथ मुंडे आज असते तर आम्हा सर्वांनसाठी ते भाग्याचे ठरले असते. ते गेल्यानंतर युती तुटली हे खरे आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर पुन्हा युती झाली. त्यानंतर पाच वर्षे सुखाने संसारही झाला. मात्र, पुढे केंद्र आणि राज्यात युती सरकारमध्ये राहूनही शिवसेनेने केवळ शिव्या- शाप देण्याचंच काम केले. असे असले तरी भविष्यात सेना- भाजप युती टिकवण्याचेच प्रयत्न भाजप वरिष्ठ नेत्यांचे राहतील. असे सूतोवाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आज असते तर शिवसेना- भाजप युती तुटली नसती. याविषयी पाटील यांना विचारले असता ते बोलत होते. मांजरी बुद्रुक येथील मांजराई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुळातच युती तुटली नसती असे म्हणणे हे राऊत यांचे विश्लेषण आहे. असे असले तरी आज भाजपचे जे आमचे नेते आहेत त्यांचाही युती टिकावी यासाठीच प्रयत्न राहील. यावेळी ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
आत्ताचे सरकार हे गोंधळ घालणारे
इम्पिरिकल डेटाबाबत राज्य सरकार एकही पाऊल पुढे गेले नाही. मुळातच ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि आरोग्य विभाग आणि आता म्हाडा भरतीचा पेपर फुटणे याविषयी काय चालले आहे हे या महाविकास आघाडी सरकारला समजत नाही. कारण हे सरकार फक्त गोंधळ घालणारे सरकार आहे. अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. २७ टक्के आरक्षण वगळून निवडणूक घेऊ शकता असे म्हटले आहे, निवडणुका घ्याव्याच असे अजिबात म्हटले नाही. तरीही सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही. २७ टक्के वगळून जर निवडणूका घेतल्या गेल्या तर महापालिका किंवा नगर पालिकांमध्ये सत्ता स्थापन कशी होईल. त्यामुळे सगळ्याच निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. वारंवार संधी मिळूनही सरकारने ओबीसी आरक्षणाबाबात या सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. इम्पिरिकल डेटाबाबत काम केले नाही. आरक्षणाचा हा मुद्दा सुरू असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर देखील सरकार काही करू शकले नाही. असा आरोपही पाटील यांनी केला आहे. म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फुटीची पाळेमुळे मंत्रालयापर्यंत असल्यासाचा सनसनाटी आरोपही पाटील यांनी यावेळी केला आहे.