नवी दिल्ली – सरकारने थेट सोशल मिडीया कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अटकेची कारवाई करण्याची धमकी दिल्याची वदंता आहे. पण त्याचा माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्कार केला आहे. या मंत्रालयाने म्हटले आहे की, फेसबुक, व्हॉट्सऍप, आणि ट्विटरच्या कर्मचाऱ्यांवर अटकेची कारवाई केली जाईल असा इशारा सरकारने त्यांना दिला असल्याचा दावा केला जात आहे. पण ते खरे नाही. आमचे म्हणणे फक्त एवढेच आहे की, या कंपन्यांनी भारतीय कायदे आणि भारतीय घटनेनुसारच काम करावे.
या कंपन्यांना सरकारची ही भूमिका संसदेत निवेदन करूनच सांगण्यात आली आहे. सोशल मिडीयात सरकारविरोधी लिखाण केले जाऊ शकते पण हिंसाचार अथवा सामाजिक तेढ निर्माण होईल असा प्रचार त्यातून केला गेल्यास त्या अनुषंगाने मात्र कारवाई केली जाईल असे सरकारने त्या कंपन्यांना स्पष्ट केले आहे असे आयटी मंत्रालयाने म्हटले आहे. नियमांचा भंग करणारे 200 ट्विट्स काढून टाकण्याची सुचना सरकारने मध्यंतरी ट्विटरला केली होती.
ट्विटर कंपनीने प्रथम ही सुचना मान्य करण्यास नकार दिला होता पण नंतर त्यांना भारतीय कायद्यानुसार कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर त्यांनी ही सुचना मान्य केली आहे असे, आयटी मंत्रालयाने म्हटले आहे. तथापि या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तुरूंगात टाकले जाईल अशी कोणतीही धमकी लिखीत अथवा तोंडी स्वरूपात त्यांना देण्यात आलेली नाही असेही आयटी मंत्रालयाच्या स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे.