उद्योग मंत्री सुभाष देसाई याची माहिती
पुणे – शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेती आणि उद्योग यांची सांगड घालणे गरजेचे आहे, यासाठी शेतीपूरक औद्योगिक धोरण राबवण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी केले.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत शनिवारी उद्योगमंत्री देसाई यांनी संवाद साधला. यावेळी उद्योग विभागाचे पुणे विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पुणे, नाशिक, सांगली, लातूर येथील 35 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचा विचार सुरू आहे.
प्रक्रिया उद्योगावर भर देवून मूल्यवाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी तरतूद केलेल्या निधीचा अधिकाधिक उपयोग शेतकरी उत्पादक कंपन्यांनी करून घ्यावा. शेतीच्या पद्धतीत बदलासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता बदलली असून, गट शेतीवर भर द्यायला हवा. याशिवाय शेतीपूरक उद्योगांना आवश्यक कर्ज पुरवठा करण्यासाठी बॅंकांनी मानसिकता बदलायला हवी, असे मत देसाई यांनी मांडले. उद्योग उभारणीसाठी एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध करून दिली जात असून, याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी करून घेणे गरजेचे असल्याचे देसाई यांनी यावेळी नमूद केले.