Election News – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ नाशिकमध्ये फोडला असला तरी नेमका प्रचार कोणाविरोधात करायचा, असा पेच या नेत्यांपुढे पडला आहे. मनमाडमध्ये महायुतीच्या शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले असले तरी, जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना असल्याने मतदारही संभ्रमात पडले आहेत, तर मी कोणाविरोधात जास्त बोलणार नाही; परंतु त्र्यंबकेश्वरच्या भवितव्यासाठी भाजपला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नाशकातील सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, भगूर, सटाणा, चांदवड, नांदगाव, मनमाड, येवला, पिंपळगाव बसवंत आणि ओझर नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून, माघारीनंतरचे चित्र सष्ट झाले आहे. या निवडणुकीत कुठे महायुतीच्या घटकपक्षांची मविआसोबत, तर कुठे मविआची महायुतीच्या घटकपक्षांसोबत हातमिळवणी झाल्याने विचित्र आघाड्या तयार झाल्या आहेत. मात्र, या विचित्र आघाड्यांचा मोठा फटका महायुतीतल्या नेत्यांना प्रचारादरम्यान बसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे आक्रमक भाषणांसाठी ओळखले जाणारे फडणवीस यांना त्र्यंबकेश्ररमध्ये संयम बाळगावा लागत आहेत. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महायुतीचे घटकपक्ष एकमेकांविरोधात लढत असल्याने फडणवीस यांनी उमेदवारांची नावे घेऊन नगरांच्या भविष्यांसाठी भाजप उमेदवारांच्या पाठीशी राहा असे सांगत भाषण आवरते घेतले. त्यामुळे विरोधी उमेदवारांवर फडणवीस हल्लाबोल करतील, अशा विचारात असलेल्या भाजपच्याच उमेदवारांचा मात्र भ्रमनिरास झाल्याचे चित्र होते. “धनुष्यबाण, कमळाला मतदान करा” – उपमुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सटाणा, मनमाड आणि सिन्नर या तीन ठिकाणी सभा घेतल्या. सटाण्यात भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना आहे, तर नांदगाव, मनमाडमध्ये शिंदे सेना आणि भाजप हे राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात एकत्र आहेत. येवल्यात शिंदे सेनेसोबत चक्क राष्ट्रवादी अजित पवार गट असून, भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात आहे. सिन्नरमध्येही तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. त्यात शिंदे यांनी मनमाडमध्ये महायुतीच्या धनुष्यबाण, कमळालाच मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले. त्यामुळे मतदारराजा संभ्रमात सापडला असून, नेमके मतदान कोणाला करायचे, असा पेच त्यांच्याही समोर उभा ठाकला आहे.