मुंबई – राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास मान्यता देण्याच्या माननीय सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. महाविकास आघाडी सरकारने सदर आरक्षण टिकवण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले व त्या प्रयत्नांना यश आल्याचे मला समाधान आहे. अशी प्रतिक्रिया ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. या आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही होता तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली. यासाठी बांठिया कमिशन हे महाविकास आघाडी सरकारने नेमले गेले, असे त्यांनी सांगितले.
या आयोगाकडून सादर करण्यात आलेला अहवाल सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत होत आहेत. महाराष्ट्र निवडणुक आयोगाने ताबडतोब राज्यात निवडणुका घोषित कराव्या, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.