Eknath Shinde: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या जवळीकीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत ठाकरे बंधू सात वेळा एकत्र आले असून, आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, शिंदे यांनी ‘मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे,’ असा टोला लगावला आहे. अंबरनाथ येथे धर्मावीर आनंद दिघे नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी शिंदे बोलत होते. ‘भाऊबंदकी’नंतर आता ‘मनोमिलन’- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी होत असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोघे एकत्र लढण्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “पूर्वी ‘भाऊबंदकी’ नाटक गाजलं होतं, मात्र आता ‘मनोमिलन’ नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.” असा थेट टोला त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना लगावला. ‘पराभव दिसू लागल्याने निवडणुका पुढे ढकला म्हणतात’- निवडणुकांच्या मुद्द्यावरूनही शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ते म्हणाले, “निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते, आता त्यांना पराभव दिसू लागला आहे, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असे म्हणत आहेत.” अशोक सराफ यांच्या ‘सारखं छातीत दुखतंय’ नाटकाचा उल्लेख- अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत बोलताना शिंदे यांनी त्यांच्या ‘सारखं छातीत दुखतंय’ या गाजलेल्या नाटकाचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. “अशोक मामांचं एक नाटक होतं ‘सारखं छातीत दुखतंय’. मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचे यश पाहून काही लोकांच्या छातीत सारखं दुखतंय,” असे उपरोधिक वक्तव्य शिंदे यांनी केले. शिवाजी पार्कवर दिपोत्सवात एकत्र – शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दिपोत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले होते. मनसेच्या या दिपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचे सर्व कुटुंबिय उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजूटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला होता. याच वाढत्या जवळीकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.