रायगड : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे. शिंदेंना भेटताच काळोखे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी केली आहे. यावर आपण काळोखे कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे असून कुणालाही सोडणार नाही असे शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे म्हणाले, लोकांनी ज्यांना विजयी केले त्यांच्याविरोधात सूडाचे राजकारण करण्यात आले आहे. अशी घटना परत घडता कामा नये. माझे या केसवर लक्ष आहे. मी कुणालाही सोडणार नाही, आरोपींना ठेचून काढू. मी काळोखे परिवाराच्या मागे ठामपणे उभा आहे, असे शिंदे म्हणाले. या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले, त्या सचिन हिरेंना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी यावेळी शिंदे यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, मंगेश काळोखे यांच्या हत्येतील मुख्य दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी वेगवेगळ्या तपास टीम कार्यरत होत्या. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे शनिवारी सकाळी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांना पकडल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय? शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी मंगेश काळोखे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधून भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. २१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांचा विजय निश्चित झाला होता. मंगेश काळोखे हे सकाळी आपल्या मुलीला शिशुमंदिर शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना मारेकऱ्यांनी त्यांची मोटारसायकल अडवून धडक दिली. त्यानंतर त्यांनी काळोखे यांचा पाठलाग करून विहारी चौकात गाठले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर अमानुष हल्ला चढवला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी मयत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज काळोखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण आणि अन्य तीन अनोळखी इसमांनी प्रत्यक्ष हल्ला केला असल्याचा आरोप आहे. तसेच रविंद्र परशुराम देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांनी खुनाचा कट रचल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.