Eknath Shinde : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. मात्र, या युतीमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत नाराजी आणि राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे पत्र लिहून स्वतःची हकालपट्टी करण्याची थेट मागणी केली आहे. दुसरीकडे, कल्याण ग्रामीणचे उपशहर प्रमुख मनोज गणपत चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनांमुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून, निवडणुकीआधीच पक्षातील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. कैलास शिंदे यांचे पक्षाला पत्र कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी पक्षाच्या नेतृत्वाला पत्र लिहून पक्षातून स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडक टीका केली आहे. “आज निष्ठेला किंमत राहिलेली नाही, आर्थिक क्षमता हाच एकमेव निकष बनला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कैलास शिंदे यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने चार प्रभागांचा एकत्रित पॅनल तयार केल्यामुळे नोकरी करणाऱ्या किंवा सामान्य आर्थिक परिस्थितीतील व्यक्तींना निवडणूक लढवणे अशक्य झाले आहे. “ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे, तेच निवडणूक लढवू शकतात. ही निवडणूक फक्त पैसेवाल्यांसाठीच राहिली आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या प्रभागात सुमारे ५२ हजार मतदार आहेत आणि चार प्रभागांच्या एकत्रित पॅनलची निवडणूक लढवणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत २० वर्षांपासून निष्ठेने काम केल्यानंतरही ऐनवेळी युती झाल्यामुळे कार्यकर्त्यांना घरी बसण्याची वेळ येते, हे अन्यायकारक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले आहे. पक्ष सोडण्यामागे जागावाटप हे मुख्य कारण नसून, आपण राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होऊ इच्छितो, म्हणूनच पक्षाकडे स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, काही भाजप नगरसेवकांच्या वर्तनावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “त्यांच्या वागणुकीमुळे परिसरात हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा लोकांचे काम मी कधीच करणार नाही,” असे ठाम मत त्यांनी मांडले आहे. मनोज गणपत चौधरी यांचा राजीनामा दुसरीकडे, कल्याण ग्रामीण भागातील शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आणि परिवहन समितीचे माजी सभापती मनोज गणपत चौधरी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की, २०१८ पासून आपण निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होतो आणि पक्षाकडून संधी आणि योग्य सन्मान मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, भाजपशी युती झाल्यानंतर आपल्याला डावलले जाईल, अशी शंका निर्माण झाल्याने त्यांनी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. मनोज चौधरी यांनी पुढे बोलताना म्हटले की, “सध्या कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, युतीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मी निराश झालो आहे.” या राजीनाम्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.या सलग राजीनाम्यांमुळे आणि उघडपणे करण्यात आलेल्या आरोपांमुळे कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुकीआधीच राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून, याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. पक्ष नेतृत्व याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.