मुंबई – शिवसेना आमदारांनी पुकारलेले बंड महविकास आघाडी सरकारसाठी मोठा भूकंप ठरले आहे. सेनेच्या 39 आमदारांसह अन्य छोट्या पक्षाचे व अपक्ष असे जवळपास 50 आमदार आघाडीतून फुटले आहेत. अशातच राज्यात सरकार चालवण्यासाठी ठाकरे यांच्या सरकारकडे बहुमत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे आज गुवाहाटीमध्ये वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिंदे यांनी देवदर्शनानंतर आपण उद्या मुंबईत येऊन बहुमत चाचणीसाठी हजर राहणार असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा राज्यपालांची भेट घेत सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी केली होती. विरोधीपक्ष भाजपची ही मागणी मान्य करत राज्यपाल कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला आहे.
राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार आता ठाकरे सरकारला उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यावेळी ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार का हे पाहावे लागणार आहे. मात्र संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत ’११ तारखेपर्यंत त्यावर निर्णय होणार नाही. यादरम्यान असं काही घडलं, तर सर्वोच्च न्यायालयाने दाद मागण्याची मुभा दिली आहे. अशात राजभवन आणि भाजपा मिळून संविधानाच्या चिंधड्या उडवत असेल, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागेल.’ असे म्हटले आहे.