Eknath Shinde – महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी मुंबईऐवजी नागपुरात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या घड्यामोडी घडत आहेत. शिंदे सेनेतील बड्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे बड्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर बडे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यास गेले होते. पण, त्यांना तब्बल 5 तास वेटिंगवर ठेवल्याची माहिती मिळत आहे. शिंदे सेनेतील वाचाळवीर आणि अकार्यक्षम असलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तीन ते चार नेत्यांचा पत्ता कट होऊ शकतो. त्यात दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. हे नेते केवळ आश्वासनं देतात. प्रत्यक्षात काम करत नाहीत, असा आरोप शिवसेनेचे आमदार खासगीत करतात. अब्दुल सत्तार यांच्या नावाला शिवसेनेसह भाजप आमदारांचाही विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळ विस्तारात यातील तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे नेत्यांनी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी रात्री संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगला गाठला. मात्र, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याची माहिती आहे. केसरकर आणि सावंत यांची मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. पण, तब्बल 5 तास शिंदेंनी केसरकर आणि सावंत यांना वेटिंगवर ठेवल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. त्यामुळे सावंत आणि केसरकर यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे.