संजय राऊत अन् उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा धागा एकनाथ शिंदेंनी पकडला; ‘ठाकरे बंधूं’च्या युतीबाबत भरसभेतून परखड भाष्य म्हणाले….

Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट असल्याने मेळावा रद्द केला जाईल किंवा ठिकाण बदलण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं. पण अखेर पावसातही मेळावा पार पडला. या मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यावर भाष्य केलं.
या दसरा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे दिसणार असल्याची चर्चा होती. यामुळे ‘ठाकरे बंधू’ची राजकीय युतीची घोषणा करणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थवर भाषण करताना शेजारील शिवतीर्थ (राज ठाकरेंचं निवासस्थान) देखील आपलंच आहे, असा उच्चार केला होता.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात त्यांनी एकत्र येण्यावर अत्यंत महत्वाचं विधान केलं. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या एकत्र येण्याबाबत केला. आम्ही मराठीसाठी कायम एकत्र राहणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा दोघेही भाऊ एकत्र नेमकं कधी येणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दोघांच्या एकत्र येण्याचा मुहूर्त नेमका कधी असाही सवाल विचारला जात आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले…
दुसरीकडे शिवसेना या पक्षाचा दसरा मेळावा देखील उत्साहात पार पडला. या मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. त्यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर मोठं विधान केलं. कोण कुणाशी मनोमिलन करतं याची चिंता करण्याची गरज नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “भारत कोणासमोरही झुकणार नाही, अमेरिकेचे टॅरिफ..” ; व्लादिमीर पुतिन यांचा ट्रम्प यांना मोठा इशारा





