पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपले भाऊ निखिल खडसे यांच्या 2013 मधील आत्महत्येच्या घटनेवर प्रथमच सविस्तर खुलासा केला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सातत्याने मुलाच्या हत्येचे आरोप होत असताना रोहिणी खडसे यांनी एका युट्यूब मुलाखतीत त्या दिवशी नेमकं काय घडलं याबाबत स्पष्टता आणली आहे. निखिल खडसेंच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या षडयंत्र सिद्धांतांना त्यांनी खोडून काढताना, त्या वेदनादायी क्षणांचा उलगडा केला आहे. या मुलाखतीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं? रोहिणी खडसे यांनी सांगितले की, निखिल खडसे यांनी त्या दिवशी सकाळपासून अनेक लग्नांना हजेरी लावली होती. दुपारी ते मुक्ताईनगर येथील घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी आई मंदाताई आणि पत्नी रक्षा खडसे यांच्यासोबत हॉलमध्ये चहा घेतला. त्यानंतर निखिल आपल्या बेडरूममध्ये गेले. रक्षा खडसे काही वेळाने बाहेर पडून किचनकडे गेल्या. याचवेळी घरात बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. मंदाताई आणि रक्षा यांनी तातडीने बेडरूममध्ये धाव घेतली, तेव्हा निखिल बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी स्वत:च्या डोक्यात त्यांच्या परवानाधारक पिस्तुलाने गोळी झाडली होती. पुढे बोलताना म्हणाल्या की, त्या वेळी मी पुण्यात होते, कारण माझी एलएलएमची अंतिम परीक्षा होती. एकनाथ खडसे हे गावातील एका ग्रामपंचायत सदस्याच्या लग्नासाठी बाहेर गेले होते. घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच नारायण चौधरी आणि इतरांनी निखिल यांना तातडीने ॲम्बुलन्सने जळगावच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, गोळी थेट डोक्यात लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. एकनाथ खडसे निखिल यांना ॲम्बुलन्समध्ये टाकताना घरी पोहोचले होते. रोहिणी यांनी स्पष्ट केले की, ही घटना गावकऱ्यांसमोर घडली असून, यात कोणतेही गुपित नाही. दरम्यान, निखिल खडसेंच्या मृत्यूवरून एकनाथ खडसे यांच्यावर हत्येचे आरोप होत असताना, रोहिणी खडसे यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. त्या म्हणाल्या, ज्या घटनेसाठी लोक राजकारण करतात, त्या वेळी बाबा (एकनाथ खडसे) घरीच नव्हते. संपूर्ण गाव आमच्या घरी जमले होते. ही घटना लपवण्यासारखी नाही, कारण ती सर्वांसमोर घडली. राजकारणाची पातळी खालावली असून, निखिल यांच्या मृत्यूचा वापर राजकीय हेतूंसाठी होत आहे. आरोप-प्रत्यारोपांना मर्यादा असावी, असंही खडसे म्हणाल्या. निखिलला मणक्याच्या गंभीर वेदना होत होत्या रोहिणी खडसे यांनी सांगितले की, निखिल यांना मणक्याच्या L4 आणि L5 मणक्यांमध्ये गंभीर वेदना होत होत्या. त्यांचे एक वर्षापूर्वी स्लिप डिस्कचे ऑपरेशन झाले होते, परंतु त्यानंतरही वेदना कायम होत्या. डॉक्टरांनी दुसऱ्या ऑपरेशनचा सल्ला दिला होता, परंतु यशस्वीतेची खात्री नसल्याने कुटुंबाने तो पर्याय टाळला. “त्याच्या वेदना असह्य होत्या. पेनकिलर्स घेतल्यानंतर थोडा आराम मिळायचा, पण परिस्थिती पुन्हा तशीच व्हायची, असे रोहिणी यांनी सांगितले. निखिल यांना 2010 मध्ये विधान परिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे ते काहीसे नाराज होते. रोहिणी यांनी म्हटले की, निखिल यांच्या मनात काय चालले होते, हे कोणालाच कळले नाही. त्या म्हणाल्या, “12 एप्रिलच्या रात्री माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते. त्यांनी मला मुक्ताईनगरला येण्यास सांगितले, पण माझी 13 तारखेला परीक्षा होती. मी म्हणाले, परीक्षा झाल्यावर येऊन बोलू. त्यांच्या मनात काय होते, हे त्यांच्यासोबतच गेले.” हे त्याने ठरवून केलेलं नव्हतं निखिल यांनी कोणतीही सुसाइड नोट ठेवली नव्हती, यावर रोहिणी खडसे यांनी स्पष्टता आणली. त्या म्हणाल्या, “हे त्याने ठरवून केलेले नव्हते. तो एक क्षण आला, आणि त्याने त्या क्षणात हा निर्णय घेतला. तो एकटाच खोलीत होता. रक्षा वहिनी खोलीतून बाहेर पडल्या होत्या, आणि आई किचनमध्ये होत्या. त्याने हा निर्णय का घेतला, हे सांगायला कोणीच नव्हते.” रोहिणी यांनी पुढे सांगितले की, निखिल यांचे आयुष्य उत्साहाने जगण्याची त्यांची पद्धत होती, आणि ते ढासळणाऱ्या व्यक्तींपैकी नव्हते. परंतु, त्या क्षणात त्यांना स्वत:ला सावरता आले नसावे. त्या स्वत:लाही दोष देतात की, जर त्या त्या वेळी मुक्ताईनगरला गेल्या असत्या, तर कदाचित ही घटना टाळता आली असती. कुटुंबावर पडलेला आघात निखिल यांच्या मृत्यूनंतर खडसे कुटुंबावर मोठा आघात झाला. रोहिणी यांनी सांगितले की, त्यावेळी निखिल यांचा मुलगा गुरुनाथ फक्त अडीच वर्षांचा होता. “आम्ही त्याला खूप कष्टाने वाढवले. ही वेदना आमच्या सर्वांसाठी असह्य आहे,” असे त्या म्हणाल्या. निखिल यांच्या पत्नी रक्षा खडसे सध्या रावेरमधून भाजपच्या खासदार आहेत, तर रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा आहेत. निखिल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने राजकीय आणि वैयक्तिक आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु या घटनेची सावली आजही त्यांच्यावर आहे.