मुंबई – सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता आणि बिग बॉस स्पर्धक एजाझ खानला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एजाज खानने एक लाइव्ह व्हिडीओ केला होता.
या व्हिडीओमध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्य करुन ‘कायम मुस्लीम नागरिकांनाच का दोषी धरलं जातं?, असा प्रश्न विचारला होता. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. तर काहींनी मुंबई पोलिसांकडे त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. यानंतर, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात एजाझ आक्षेपार्ह बोलत असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याची भाषा तेढ पसरवणारी आणि द्वेषमूलक होती, असं खार पोलिसांनी सांगितलं. भारतीय दंड संहितेच्या 153 A, 117, 188, 501, 504, 505 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय म्हणाला एजाज खान ?
‘एक लहानशी मुंगी मेली तरी मुस्लीम नागरिक जबाबदार, हत्ती मेला तरी मुस्लीम नागरिक जबाबदार, दिल्लीत भूकंप आला तरी तेच जबाबदार. हे मुस्लीम नागरिक जमिनीच्या खालती जाऊन त्यांनी जमिनी हलवली म्हणून दिल्लीत भूकंप आला. म्हणजे थोडक्यात काय तर काहीही झालं तरी मुस्लीमचं जबाबदार. पण हे कटकारस्थान कोण रचतंय माहिती आहे का? कधी याचा विचार केला आहे का तुम्ही ? करोनावरुन प्रत्येकाचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला मुद्दाम धार्मिकतेचा रंग दिला जात आहे. त्यामुळे देशात जे असं करतायेत त्यांना सगळ्यांना करोना होवो ही इच्छा’.