कोलकाता – कोलकाता उच्च न्यायालयाने बीरभूम येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या संबंधात पश्चिम बंगाल सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीला त्यांची कागदपत्रे आणि अटक केलेल्या आरोपींना केंद्रीय तपास संस्थेकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती आर भारद्वाज यांच्या खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (सीबीआय) या प्रकरणाच्या पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई गावात एका स्थानिक तृणमुल नेत्याची हत्या झाल्यानंतर हा हिंसाचार उद्भवला होता. यात एका घराला आग लाऊन त्यातील आठ जणांना जीवंत जाळण्यात आले आहे. या भीषण घटनेची दखल खंडपीठाने स्वत:हून घेतली होती.