मला “मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल, सर्वोत्तम बाल कलाकाराचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते ते पारितोषिक स्वीकारुन मी मुंबईतल्या घरी आलो आणि माझ्या वडीलांना- राज कपूर- यांना ते पारितोषिक दाखवले. त्यावेळी वडील मला म्हणाले, की जा हे पारितोषिक तुझ्या आजोबांना – पृथ्वीराज कपूर – यांना हे परितोषिक दाखव आणि आशीर्वाद घे.’ त्याप्रमाणे मी माझ्या आजोबांच्या खोलीत गेलो आणि त्यांना आनंदाने मला मिळालेले पारितोषिक दाखवले. त्यावेळी भावविभोर झालेल्या माझ्या आजोबांच्या डोळ्यांत पाणी आले आणि ते एकच वाक्य ते बोलले… “आज राजने (राज कपूर) मेरा कर्जा उतार दिया…’ म्हणजे माझ्या वडीलांना अभिनयाचा जो वारसा त्यांच्या वडीलांकडून मिळाला होता, तो आता तिसऱ्या पिढीतही सक्षमपणे हस्तांतरीत झाला…’ हे शब्द होते ऋषी कपूर यांचे.
जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये, त्यांचे आत्मचरित्र “खुल्लम खुल्ला : ऋषी कपूर अनसेन्सॉर्ड’ प्रकाशित झाले, त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना ऋषी कपूर म्हणाले होते की, आता रणबीरच्या फिल्मी दुनियेतल्या पदार्पणानंतर, कपूर घराण्याची चौथी पिढीही दर्जेदार अभिनयाचे सक्षमपणे दर्शन घडवत आहे. सिनेसृष्टीमधले संवेदनशील आणि नैसर्गिक अभिनयाचे पाईक म्हणून गणले जाणारे ऋषी कपूर आता आपल्यात नाहीत, हे मान्य करणे तितकेसे सोपे नाही. सहजसुंदर अभिनय, म्युझिकल हिट्सची मोठी संख्या आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि किमान पाच दशके रुपेरी पडदा गाजवलेला हा महान अभिनेता आपल्या सर्वांना शोकसागरात बुडवून अखेरच्या प्रवासाला निघून गेला आहे.
“हिंदी सिनेसृष्टीला जर शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली असतील, त्यामधील किमान 80 टक्के कालखंडावर कपूर घराण्याची नाममुद्रा आहे, आणि अशा घराण्यात जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणूनच, या घराण्यातला आत्मचरित्र लिहिणारा मी पहिला माणूस असल्याचाही मला अभिमान आहे,’ असे सांगणारे ऋषी कपूर म्हणजे ऐंशीच्या दशकातले रसिकप्रिय अभिनेते होते. साधारण सत्तरच्या दशकानंतर मारधाड आणि हाणामारीच्या सिनेमांची जोरदार चलती होती. त्यावेळी सुनिल दत्त, धर्मेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आणि “अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन अशा एकाहून एक उग्र भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांसमोर, एक संवेदनशील- खराखुरा इमोशनल आणि रोमॅण्टीक नायक साकारणे आणि त्या विरुद्ध प्रकृतीच्या प्रवाहात अव्याहत टिकून रहाणे, हे त्यावेळी वाटते तितके सोपे नव्हते. देव आनंद, राजेन्द्र कुमार, दिलीपकुमार, शम्मी कपूर आणि राजेश खन्ना यांचा रोमॅंटीक सिनेमाचा काळ संपत चालला होता आणि अशातच ऋषी कपूर यांचा सिनेसृष्टीत प्रवेश झाला.
वडील राज कपूर यांच्या आरके प्रॉडक्शन्सच्या “श्री 420′ या सिनेमातल्या “प्यार हुआ इकरार हुआ…’ या गाण्यातील अल्पशा दर्शनानंतर, “मेरा नाम जोकर (1970)’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून आपल्या भूमिकेला संस्मरणीय केलेल्या ऋषी कपूर यांचा नायक म्हणून गाजलेला पदार्पणाचा सिनेमा म्हणजे “बॉबी (1973)’. या सिनेमात पदार्पण करत असलेल्या डिम्पल कपाडियाबरोबर ऋषी कपूर यांची जोडी अशी काही जमली की, रोमॅंटीक हिरोचा नवा चेहरा आणि त्यावेळच्या युवापिढीचा प्रातिनिधिक हिरो म्हणून ऋषी कपूर यांचं नाव सर्वतोमुखी झालं.
एक म्युझिकल हिट ठरलेल्या “बॉबी’ मुळे मारधाड चित्रपटांनी वैतागलेल्या सिनेरसिकांना प्रणयकथांचा आनंद घेता आला तो ऋषी कपूर यांच्या सिनेमांमुळे. सर्वसामान्यपणे अभिनयाचे नैसर्गिक अभिनय आणि तंत्रशुद्ध अभिनय किंवा मेथड ऍक्टींग असे दोन प्रमुख प्रकार मानले जातात. मेथड ऍक्टींगमध्ये काही तंत्रांचा वापर केला की, दिग्दर्शकाला हवा तो परिणाम मिळतो. नैसर्गिक अभिनयामध्ये तसे नसते. त्यासाठी दिग्दर्शकाला अभिनेत्याच्या अंगभूत अभिनय कौशल्याचा उपयोग करुन घ्यावा लागतो. ऋषी कपूर हे असे दुसऱ्या प्रकारातले, नैसर्गिक अभिनेते होते. त्यांची संवादफेक, चेहऱ्यावरील हावभाव आणि शरिराची भाषा (बॉडी लॅंग्वेज) याचा अतिशय सुंदर मिलाफ त्यांच्या भूमिकांमध्ये दिसून येतो. शब्द उचारण्यापूर्वीच तो भाव डोळ्यांतून व्यक्त करण्याचे ऋषी कपूर यांचे कसब हे अत्यंत लाजवाब असे होते.
पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, अगदी अलीकडचा शाहरुख खान असे दिग्गज अभिनेते हे नैसर्गिक अभिनयाचे मानदंड मानले जातात. त्या अभिनय परंपरेतले आणखी एक मानाचे पान म्हणजे ऋषी कपूर. “लैला मज़नू’ “कभी कभी’ (दोन्ही 1976), “हम किसीसे कम नही’ (1977) अशा सिनेमांसह अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्यासमवेत त्यांनी केलेला “अमर अकबर अँथनी’ हा “हरवले-सापडले’ संकल्पनेवरचा सिनेमा कसा विसरता येईल? आता तर या त्रिकुटातला “अमरही (विनोद खन्ना) गेला आणि अकबरही गेला आहे.’ वर्ष 1979 मध्ये आलेला जयाप्रदा या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या हिंदी पदार्पणाचा “सरगम’ हा म्युझिकल हिट सिनेमाने तिकिट खिडकीवर केलेली कमाई आजही विक्रमी मानली जाते.
वर्ष 1980 मध्ये आलेल्या पुनर्जन्मावरील कथेवर आधारित “कर्ज़’ हाही म्युझिकल हिट ठरला. वर्ष 1982 मध्ये विधवा पुनर्विवाहाच्या मध्यवर्ती कथेवरचा “प्रेमरोग’ हा ऐंशीच्या दशकातला सर्वाधिक चर्चेचा सिनेमा ठरला होता. आपल्या प्रेयसीचे लग्न अन्यत्र ठरल्याचे समजल्यानंतर नायक तिच्या हवेलीमध्ये जातो, त्यावेळी नायिका (पद्मिनी कोल्हापुरे) “ये गलियॉं, ये चौबारा, यहॉं आना ना दोबारा…’ ही गीत गात असते. त्यावेळी जे भाव ऋषी कपूरच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतात, तिथेच त्याच्यामधल्या एका निष्णात अभिनेत्याची ओळख आपल्याला पटते.
इतकेच नव्हे तर, वर्ष 1986 मध्ये आलेल्या, तमिळ सिनेमा दुपोरांगल सैबथिलाई’ चा रिमेक असलेला, “नसीब अपना अपना…’ हा सिनेमा आला होता. प्रथम पत्नीला अंधारात ठेऊन, दुसरा विवाह करावा लागलेल्या पतीच्या भूमीकेत, सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ऋषी कपूरच्या यांच्या चेहऱ्यावर, जो अपराधी भाव आणि संभ्रमावस्थेचे जे “बेअरिंग’ पकडलेले आहे, ते अविश्वसनीय अशा अभिनयाचे दर्शन आहे, हे नक्की. ज्यांनी “कर्ज़’, “प्रेमरोग’ आणि “नसीब अपना अपना’ पाहिले नसतील, त्यांनी ते आवर्जून पहावेत आणि ऋषी कपूर यांच्या समर्थ अभिनयाचा प्रत्यय जरूर घ्यावा.
पत्नी नितू सिंग-कपूरसमवेत तब्बल 15 रोमॅंटीक सिनेमे करणाऱ्या ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चनबरोबर “कुली’ (1983), कमल हासनसमवेत “सागर’ (1985) आणि अगदी अलीकडे वर्ष 2012 मध्ये ऋत्वीक रोशनसमवेत “अग्नीपथ’ असे सिनेमे करत आपल्या प्रभावी अभिनयाचे दर्शन घडवले.
श्रीदेवीसमवेत “नगिना’, “चांदनी’, मीनाक्षी शेषाद्रीसमवेत “दामिनी’, माधुरी दीक्षितबरोबर “साहिबान’ रेखासमवेत “आझाद देश के गुलाम’, जुही चावलासमवेत “बोल राधा बोल’ दीव्या भारतीसमवेत “दीवाना’ अशा नव्या-जुन्या पिढीतल्या तब्बल 45 नायिकांसमवेत ऋषी कपूर यांनी हिट रोमॅंटीक सिनेमे दिले. वास्तव जीवनात स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याचा मुलगा रणबीर कपूरही अभिनयाचा वारसा चालवत आहे, तर कन्या रिद्धीमा फॅशन डिझायनर म्हणून कार्यरत आहे. या नैसर्गिक अभिनयाचा मानदंड असलेल्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.