अण्णाद्रमुक पक्ष जसा कमकुवत होत जाईल, तसा त्याचा फायदा द्रमुक पक्ष उचलेल. पण अण्णाद्रमुक कमकुवत झाला तर त्या संधीचा फायदा तिसराच म्हणजे भाजप उचलू शकतो.
महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेतील बंडखोर नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बडोद्यात भेट झाली आणि केंद्रीय मंत्री अमित शहादेखील त्यावेळी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते, असे वृत्त आहे. राज्याच्या अनेक भागांत शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी निषेध मोर्चे नेले आणि काही ठिकाणी तोडफोडही केली. “मला कोणत्याही पदाचा मोह नाही, म्हणून मी वर्षा हे निवासस्थान सोडले. पण याचा अर्थ संघर्ष सोडला असे नव्हे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेणाऱ्यांनी ठाकरे व शिवसेना या नावांशिवाय जगून दाखवावे’, असे आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तर “आमचीच खरी शिवसेना’, असा दावा शिंदे गटाचा असून, दोनतृतीयांश आमदार आपल्या सोबत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेत जशी फूट पडली आहे, त्याचप्रमाणे तामिळनाडूत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुक या पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत. तेथेही पक्षनेतृत्वाचा मुद्दा संघर्षबिंदू बनला आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता या अत्यंत लोकप्रिय नेत्या होत्या. एन. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांनी पक्ष व्यवस्थित सांभाळला. एमजीआर यांच्या पत्नी व्ही. एन. जानकी या अल्पकाळ मुख्यमंत्री होत्या. परंतु त्यांचे नेतृत्व अयशस्वी ठरले. पुढे पक्षाची कमान जयललिता यांनीच सांभाळली आणि उत्तमपणे कारभार केला. मध्यान्ह भोजन योजना, अण्णा कॅंटीन, यासारख्या अनेक योजना त्यांनी राबवल्या आणि तामिळनाडूची औद्योगिक प्रगतीही सुरू ठेवली. अर्थात त्यांचा कारभार हा भ्रष्ट होता, यात शंकाच नाही. याबद्दलच्या आरोपांमुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली. परंतु तरीदेखील त्यांचा व्यक्तिगत करिश्मा कायम होता. त्यांच्या नेतृत्वास पक्षात कोणीही आव्हान दिलेले नव्हते. मात्र त्यांच्या निधनानंतर नेतृत्वाच्या प्रश्नावरून पक्षात निर्माण झालेली दुफळी अद्याप संपलेली नाही.
सत्तेवर असताना केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकारच्या मदतीने नेतृत्व आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेले माजी मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी आता पुन्हा वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा विजय झाला आणि एम. के. स्टॅलिन हे मुख्यमंत्री बनले. अशावेळी पुन्हा सत्तेवर यायचे असेल, तर पक्षातील दुही संपुष्टात आणली पाहिजे आणि विरोधी पक्ष म्हणून खंबीर काम करायला हवे. परंतु अण्णाद्रमुक हा दिशाहीन झाला असून, पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम या दोघांनीही नेतृत्वावर दावा केला. त्यापैकी कोणालाही यश न आल्याने, हे दोघे संयुक्तपणे पक्षाची कमान सांभाळत आहेत. परंतु मोका मिळेल तेव्हा उभयता शक्तिप्रदर्शन करत असतात. गेल्या आठवड्यात पक्षाची कार्यकारिणी आणि सर्वसाधारण परिषद या दोहोंची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकांमध्ये, नेतृत्वाच्या मुद्द्यावरून कोणताही निर्णय होऊ नये, म्हणून पनीरसेल्वम यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. परंतु प्रत्यक्ष बैठकीत पलानीस्वामींच्या समर्थकांनी गोंधळ घातला.
पलानीस्वामी हेच पक्षाचे नेते हवेत, अशा मागणीच्या घोषणा त्यांनी दिल्या. एरवी लोकशाही, घटना यांचा उदोउदो करणाऱ्या आणि मुख्यमंत्रिपद संभाळलेल्या पलानीस्वामी यांनी आपल्या समर्थकांना आवरले नाही. त्यामुळे वैतागलेले पनीरसेल्वम बैठकीतून बाहेर पडले. पक्षाला प्रगतिपथावर नेण्यासाठी नेतृत्व एकाच व्यक्तीकडे असावे, अशा मागणीचा ठराव या बैठकीत मांडला गेला व त्यावर 2190 सदस्यांनी सह्या केल्या. याचा अर्थ, पलानीस्वामी हे अण्णाद्रमुकचे एकनाथ शिंदे आहेत. पक्ष द्विकेंद्री नसावा आणि नेतृत्व एकमुखीच असावे, असा त्यांचा आग्रह आहे. तत्त्वतः यात काहीही चूक नाही. परंतु जे करायचे, ते कायदेशीर व लोकशाही मार्गाने झाले पाहिजे. मात्र एवढे असूनदेखील पनीरसेल्वम यांनी नेतृत्वाच्या शर्यतीतून माघार घेतलेली नाही. दुहेरी नेतृत्वाचा पक्षाला उपयोगच होत आहे, असे उद्गार त्यांनी काढले आहेत. इंदिरा गांधींच्या काळात सर्व सत्ता त्यांच्याच हातात केंद्रित झालेली होती. त्यांनी पक्ष दोनवेळा फोडला आणि पक्षातील बड्या बड्या धेंडांमागे नव्हे, तर आपल्यामागे जनता आहे, हे सिद्ध करून दाखवले. मात्र हे करताना, कॉंग्रेस कार्यकारिणीतदेखील झुंडशाही करण्यात आली, हा इतिहास आहे.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, कॉंग्रेस अध्यक्ष नामधारी असे. भारतीय जनता पक्षातही मोदी हे अधिकारशहा बनले असून, त्यांच्याच पसंतीने पक्षाध्यक्ष निवडला जातो आणि तो त्यांच्याच आज्ञेत राहतो, हे सर्वज्ञात आहे. असो. 2017 मध्ये जयललितांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीय व्ही. व्ही. शशिकला यांनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु पनीरसेल्वम यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यावेळी पलानीस्वामी मुख्यमंत्री होते. यथावकाश पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही गटांचे एकीकरण झाले आणि संयुक्त नेतृत्वाचा प्रयोग सुरू झाला. तो प्रयोग आता संपत आला असून, संयुक्त मानापमानाचा प्रयोग आता सुरू झाला आहे.
अण्णाद्रमुक जेवढा विकलांग होत जाईल, तेवढा सत्ताधारी द्रमुकचा फायदाच होत राहील. परंतु अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट पडून जर पक्षाची वाताहात झाली, तर तो अवकाश व्यापण्याचा प्रयत्न भाजप करेल, हे उघड आहे. दक्षिणेत तामिळनाडू, आंध्र, तेलंगण आणि केरळमध्ये आपली शक्ती वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपची अण्णाद्रमुकशी दोस्ती आहे, परंतु दीर्घकाळात मोदी-शहा यांना तेथेही आपले स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित करायचे आहे. म्हणूनच अण्णाद्रमुकच्या पक्षांतर्गत भांडणात द्रमुक व भाजप दोघांचाही फायदा आहे.