शिवस्मारकाची जागा म्हणजे प्रत्येकाचे अंतःकरण
मिरज, ता. 27 – “शिवाजी महाराजांचे खरे स्मारक करण्याचे एकच एक पवित्रस्थान आहे, ते म्हणजे प्रत्येकाचे अंतःकरण. त्यामुळेच आपल्या देहाचे सार्थक होईल व देश समृद्ध होईल. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते भारताचे होते. महाराष्ट्राबाहेरील प्रांतावर त्यांचे प्रेम होते. तिकडील लोक महाराजांवर प्रेम करीत’, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मिरज येथील मिरज हायस्कूलच्या भव्य मैदानावर झालेल्या विराट सभेत बोलताना काढले.
ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांप्रमाणे इतर प्रांतातील शूर व कर्तबगार लोक होऊन गेले. त्यांचा परिचय महाराष्ट्राला झाला पाहिजे व महाराजांचा परिचय इतर प्रांतांतील लोकांना झाला पाहिजे.’ शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील निरनिराळ्या प्रसंगांवर छोटे छोटे चित्रपट व तेही निरनिराळ्या भाषांत काढण्याची आपली कल्पना त्यांनी सांगितली.
चित्रपट समाजाचा उद्बोधक व आरसा बनला पाहिजे
नवी दिल्ली – आपली सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावयाची असेल तर चित्रपटांनी समाजाचा उद्बोधक आणि शिक्षक तसेच जीवनाचे यथार्थ दर्शन घडविणारा आरसा ही दुहेरी भूमिका बजावली पाहिजे, असे विचार माहिती व नभोवाणी खात्याच्या राज्यमंत्री नंदिनी सत्पथी यांनी ताश्कंद येथे आशियाई व आफ्रिकी देशाच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्यक्त केले.
वयोमर्यादा 25 ऐवजी 30 वर्षे करा!
नवी दिल्ली – सरकारी नोकरीसाठी वयाची मर्यादा सध्या 25 वर्षे आहे ती 30 करावी, अशी मागणी काल लोकसभेत सर्व पक्षांच्या खासदारांनी केली. वयोमर्यादा दुरुस्ती विधेयक आज मांडण्यात आले. या चर्चेत भाग घेताना बी. के. दास चौधरी म्हणाले, “वय मर्यादा ओलांडल्याने तरुणांना सरकारी नोकरीत येता येत नाही.’